Fact Check: देशात १ ते ३१ जुलै कडक लॉकडाऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आदेश? जाणून घ्या व्हायरल मेसेजचं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2021 12:57 PM2021-07-30T12:57:58+5:302021-07-30T13:03:05+5:30

Coronavirus: देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर तयारी केली आहे.

कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आणि चर्चा देशभरात सुरू आहे. तिसरी लाट कधी येणार? तिसरी लाट कितपत गंभीर असणार? असे विविध प्रश्न तुमच्या मनात पडत असतील. देशात पुढील काही दिवसात तिसरी लाट येणार असल्याचा इशारा तज्ज्ञ देत आहेत.

अनेक रिपोर्ट्सच्या दाव्यानुसार संभावित तिसरी लाट लहान मुलांसाठी धोकादायक मानली जात आहे. कारण अद्याप देशात १८ वर्षाखालील मुलांसाठी कुठलीही कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध नाही. त्यामुळे तिसऱ्या लाटेबद्दल सोशल मीडियात अनेक मेसेज व्हायरल होत आहेत.

याच दरम्यान सोशल मीडियावर अनेक मेसेज व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात येत आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना विषाणूनची तिसरी लाट येण्याचे संकेत देत लोकांना अधिक काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

काय खरंच देशात तिसरी लाट आली आहे का? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशाप्रकारे काही घोषणा केली आहे याबाबत सोशल मीडियावरील मेसेजची पडताळणी करण्यात आली. कारण मोदींच्या नावानं हा मेसेज लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरवण्यात येत आहे.

देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्याची तयारी सुरू झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याने लोकांसाठी विशेष संदेश पाठवला आहे. देशात १ जुलै ते ३१ जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. तिसरी लाट रोखण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे असा दावा मेसेजमध्ये केला आहे.

या मेसेजची पडताळणी करण्यासाठी अलीकडच्या सरकारी आदेशांची चौकशी केली. त्यावेळी पीआयबी(PIB) फॅक्ट चेक ट्विटर हँडलवर या मेसेजबाबत पोस्ट दिसली. पीआयबीने या मेसेजचं खंडन करत लोकांमध्ये जनजागृती केली आहे.

यात म्हटलंय की, बनावट फोटोद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हवाल्याने कोरोनाची तिसरी लाट आणि देशात लॉकडाऊन करणार असल्याचा दावा आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अशाप्रकारे कुठलीही घोषणा केली नाही. देशात ३१ जुलैपर्यंत कोणताही लॉकडाऊन नसेल.

अलीकडेच देशात ICMR चे डॉ. समीरन पांडा यांनी कोविड १९ महामारीची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकी गंभीर नसेल. लोकांनी त्यापासून घाबरण्याचे कारण नाही. परंतु काळजी घेतली पाहिजे. कोविड १९ च्या मार्गदर्शक नियमांचे पालन करणं गरजेचे आहे असं म्हटलं आहे.

भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेसाठी डेल्टा व्हेरिएंट मुख्य कारण मानलं जात आहे. या व्हेरिएंटच्या म्यूटेशनसह डेल्टा प्लस व्हेरिएंटची धोकादायक मानला जात आहे. तिसऱ्या लाटेसाठी कोरोनाचा डेल्टा प्लस व्हेरिएंट जबाबदार ठरू शकतो असं डॉक्टरांनी सांगितले आहे.

पंतप्रधानांच्या नावाने अशाप्रकारे लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणाऱ्या मेसेजपासून सावध राहावं. चुकीची आणि दिशाभूल पसरवणारी माहिती पसरवू नये असं आवाहन पीआयबीने केले आहे.