खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:29 IST2026-04-25T14:27:02+5:302026-04-25T14:29:20+5:30
CM Devendra Fadnavis PC News: विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मध्यरात्री भेट घेतल्याचा दावा करण्यात आला होता.

खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
CM Devendra Fadnavis PC News: राज्यात विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप, दावे-प्रतिदावे सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी पवार कुटुंबातून अनेक दावे करण्यात आले. यातच संजय गायकवाड यांनी 'शिवाजी कोण होता?' या पुस्तकावरून केलेल्या विधानांवर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. यात भर म्हणून बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी RSS आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. यातच महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकीवरूनही राजकीय घडामोडींना वेग येत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, असा दावा करण्यात आला होता. यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी ठाम शब्दांत भाष्य करत इशाराही दिला आहे.
उद्धव ठाकरे हे मध्यरात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगल्यावर भेटल्याचा दावा करण्यात येत आहे. एका मीडिया प्लॅटफॉर्मने याबाबत एक्सवर पोस्ट केल्याने राज्यभरात चर्चांना उधाण आले. ही भेट नेमकी कोणत्या अनुषंगाने झाली, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. या भेटीचा तपशील समोर येऊ शकला नाही. विधान परिषद निवडणुकीवरून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. उद्धव ठाकरे हे वरिष्ठ सभागृहाचे सदस्य होऊ इच्छित नसल्याचे म्हटले जात असतानाच आता या भेटीच्या दाव्यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत प्रश्न विचारला.
अशा प्रकारची कोणतीही भेट घडलेली नाही
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाली का, काय चर्चा झाली, अशा प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला. यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना मला भेटायचे असेल किंवा आमची भेट व्हायची असेल, तर ती लपूनछपून करण्याची आवश्यकता नाही. अशी भेट खुलेपणानेही होऊ शकते. असे कोणतेच विषय आमच्यात नाहीत की, जे आता लपवायची आवश्यकता आहे. अशा प्रकारची कोणतीही भेट घडलेली नाही. काही लोक जाणीवपूर्वक, चुकीच्या पद्धतीने खोट्या बातम्या देत आहेत. या खोटारड्या हँडल्सवर नोटीस बजावली जाईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
दरम्यान, संजय राऊत यांनाही पत्रकारांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारणा केली. यावर बोलताना, एक जागा महाविकास आघाडीला मिळाली आहे. त्यासंदर्भात हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे. सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. शिवसेनेने काय निर्णय घ्यायचा, कोणता उमेदवार द्यायचा, याबाबत उद्धव ठाकरे हेच निर्णय घेऊ शकतात. आता मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली का, याचे उत्तर हे दोन नेतेच देऊ शकतात, असे संजय राऊतांनी सांगितले.