पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:41 IST2026-04-25T14:40:06+5:302026-04-25T14:41:27+5:30
AAP split 2026: सात खासदार फुटल्याने आम आदमी पक्षाला मोठे खिंडार पडले आहे. त्यामुळे आगामी काळात आपला आणि धक्के बसण्याचे संकेत मिळत असून, या राजकीय भूकंपाने तीन राज्यात भाजपाला बळ मिळाले आहे.

पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
Aam Aadmi Party crisis: २०२७ मध्ये देशातील सात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात भाजपासाठी सगळीच राज्य महत्त्वाची असली, तर ज्या राज्यांमध्ये भाजपाला आपकडून आव्हान मिळणार आहे, त्या राज्यातील राजकीय समीकरणे आम आदमी पक्षातील फुटीमुळे बदलली आहेत. सात खासदार भाजपामध्ये गेल्याने प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणही बदलले आहे.
आम आदमी पार्टीविरोधात ऑपरेशन लोटसने देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. पंजाब, गुजरात, गोवा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत आहे. त्याची तयारी सुरू झाली असून, सात खासदारांनी पक्षांतर करण्याची घटना त्याचाच भाग मानले जात आहे.
तामिळनाडू, पश्चिम बंगालकडे नजरा; पंजाब, दिल्ली करेक्ट कार्यक्रम
काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक होत असून, यात पश्चिम बंगालमध्ये भाजपाने ताकद लावली आहे. त्यामुळे या राज्याचे निकाल काय लागणार, याकडे सगळ्यांचे लक्ष असतानाच दिल्लीत राजकीय भूकंप झाला. आपचे जे सात खासदार भाजपामध्ये आले आहेत, त्यापैकी काही खासदारांची भूमिका मागील पंजाब निवडणुकीत महत्त्वाची राहिली आहे.
खासदार संदीप पाठक हे आपचे महासचिव होते. पंजाब विधानसभा निवडणुकीत पाठक आणि राघव चड्डा यांनी तिकीट वाटपात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर पंजाबमधील आमदारांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी मनीष सिसोदिया यांच्यावर सोपवण्यात आली होती.
आपच्या खासदाराचा भाजपाला फायदा कसा होणार?
आम आदमी पक्ष सोडून आलेले सात खासदार भाजपाची रणनीतीला बळ देण्यासाठी फायद्याचे ठरणार आहे. खासदार राघव चड्डा हे लोकांचे मुद्दे मांडल्यामुळे प्रसिद्ध झालेले आहेत. संदीप पाठक यांचाही पंजाबमध्ये काही प्रमाणात संपर्क आहे. या दोन्ही नेत्यांचा वापर भाजपाकडून पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी केला जाणार असल्याचे भाजपामधीलच नेते म्हणत आहेत.
पंजाब आणि गोव्यामध्ये फेब्रुवारी २०२७ मध्ये निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच हा मोठा हादरा बसल्याने पक्षात आणखी चलबिचल होऊ शकते. निवडणुकीच्या तोंडावर आपमधून भाजपामध्ये काही आमदार उड्या मारू शकतात असाही अंदाज आहे.
भाजपाचे मिशन पंजाब
भाजपाने मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये पंजाबमध्ये ताकद लावली, पण त्यांना फार यश मिळाले नाही. काँग्रेसला बाजूला करून लोकांनी आम आदमी पक्षाला सत्तेत बसवले. त्यामुळे पंजाबमध्ये भाजपासमोर थेट आपचे आव्हान आहे. सध्या भाजपाचे पंजाबमध्ये दोनच आमदार आहेत.
राघव चड्डा यांना शहरी मतदारासंमोर चेहरा म्हणून न्यायचे, तर रवनीत बिट्टू यांना ग्रामीण मतदारांसमोर घेऊन जायचे अशी भाजपाची रणनीती असल्याची चर्चा आहे. संदीप पाठक आणि राघव चड्डा यांच्या माध्यमातून भाजपा आता आपच्या आमदारांपर्यंत पोहोचण्याचेही प्रयत्न करु शकते, असेही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
गुजरात, गोव्यापासून आपला दूर ठेवायचं
गोवा आणि गुजरातची सरकार भाजपाकडे आहे. मात्र, गेल्या काही वर्षात आम आदमी पक्षाकडून भाजपाला आव्हान दिले जात असल्याचे दिसत आहे. गुजरातमध्येही डिसेंबर २०२७ मध्ये निवडणूक होत आहे. त्यापूर्वीच हा झटका निर्णायक मानला जात आहे. कारण दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्रामध्ये आपचा वाढत असलेला जनाधार भाजपाची डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यामुळे आपला रोखणे भाजपासमोरचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्या दिशेने पहिला झटका बसला आहे. राघव चड्डांसह इतर खासदार भाजपासाठी पंजाबमध्ये फायद्याचे ठरणार आहेत.
पक्षालाच झटका बसल्याने गुजरात आणि गोव्यात आप किती ताकदीने निवडणूक लढेल याबद्दलही आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. महत्त्वाचे म्हणजे सात खासदार पक्षात आल्याने भाजपाची संसदेतील ताकदही वाढली आहे.