दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 14:51 IST2026-04-25T14:50:59+5:302026-04-25T14:51:47+5:30
मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील सुनेने आपल्याच घरात मोठी चोरी केली आणि एक खोटी गोष्ट रचली.

फोटो - ABP News
मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील सुनेने आपल्याच घरात मोठी चोरी केली आणि एक खोटी गोष्ट रचली. पण अवघ्या २४ तासांत या चोरीचा पर्दाफाश झाला आहे. उमरी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या लहरोली गावात ही घटना घडली आहे. पुष्पेंद्र बघेल हा तरुण गोव्यात खासगी नोकरी करतो आणि त्याची पत्नी मालती ही एकत्र कुटुंबात राहते. मालती सोडून कुटुंबातील इतर सर्व सदस्य एका लग्न समारंभासाठी बाहेर गेले होते. मालतीने बनावट दरोड्याचा भयानक कट रचला.
लहरोली गावातील घराच्या मागच्या भिंतीला मोठं भगदाड पाडलं गेलं. कपाट तोडलं आणि सामान इकडे-तिकडे फेकलं. प्रत्येक दृश्य असं तयार केलं होतं की, जणू काही खरोखरच दरोडा पडला आहे. दागिन्यांचा डबा गायब केला आणि काही सामान शेतात फेकून दिलं, जेणेकरून ही घटना खरी घडल्याचं वाटेल. सकाळ होताच ओरडण्याचा आवाज आला आणि ते ऐकून गावकरी जमा झाले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
मालती नावाच्या या महिलेने पोलिसांना सांगितलं की, "काही लोक आले, त्यांनी मला मारहाण करून बेशुद्ध केलं आणि दागिने लुटून फरार झाले." यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. फिंगरप्रिंट तज्ज्ञांना पाचारण करण्यात आलं. संशयितांचा शोध घेतला, पण घटनास्थळ मात्र काही वेगळंच सांगत होतं. तपासात कोणीही घरात जबरदस्तीने घुसल्याच्या खुणा सापडल्या नाहीत.
चौकशीत पर्दाफाश
सर्वात मोठा प्रश्न हा होता की, जर मारहाण झाली तर शरीरावर जखमा का नाहीत? येथूनच संशय बळावला. वैद्यकीय तपासणीनंतर जेव्हा पोलिसांनी कसून चौकशी केली, तेव्हा या 'दरोड्याच्या' नाटकाचा पर्दाफाश झाला. ही कोणतीही गुन्हेगारी घटना नसून आपण स्वतः रचलेला कट असल्याची कबुली महिलेने दिली.
पोलिसांनी महिलेच्या सांगण्यावरून शेतातून सुमारे १२ लाख रुपयांचे दागिने जप्त केले आहेत. सासरचे दागिने घेणं हाच या आरोपी महिलेचा मुख्य उद्देश होता आणि त्यासाठीच तिने हा संपूर्ण 'फिल्मी ड्रामा' रचला होता. दागिन्यांच्या लोभामुळे रचलेला हा कट २४ तास सुद्धा टिकू शकला नाही. सध्या या घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे.