Harbhajan Singh S Sreesanth: भारतीय क्रिकेटमधील सर्वात वादग्रस्त घटनांपैकी एक असलेल्या २००८ मधील 'थप्पड कांड' (Slapgate) म्हणजेच कानाखाली मारण्याच्या प्रकरणावरून एस. श्रीसंत आणि हरभजन सिंग यांच्यात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. यावेळेस श्रीसंतनेहरभजन सिंगवर अतिशय गंभीर आरोप केले आहेत. तसेच त्याला इन्स्टाग्रामवरून ब्लॉकदेखील करून टाकले आहे. या साऱ्या घटनेबद्दल खुद्द श्रीसंतनेच खुलासा केला आहे.
श्रीसंत आणि हरभजन यांच्यात जाहिरातीवरून वाद
हरभजन सिंगने अलीकडेच एका ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मसाठी एक जाहिरात केली. या जाहिरातीत २००८ च्या 'थप्पड कांड' प्रकरणाचा संदर्भ वापरून उपरोधिकपणे विनोद करण्यात आला. हरभजनने या जाहिरातीतून जवळपास १ कोटी रुपये कमावल्याचा दावा श्रीसंतने केला आहे. श्रीसंतने एका मुलाखतीत सांगितले की, हरभजनने केवळ पैशांच्या हव्यासापोटी या जुन्या आणि अपमानास्पद घटनेचा वापर जाहिरातीसाठी केला. हरभजनने त्याला ही जाहिरात स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यासही सांगितले होते, ज्याला श्रीसंतने स्पष्ट नकार दिला.
इन्स्टाग्रामवर ब्लॉक
"मी त्याला माफ केले आहे, पण मी ही घटना कधीही विसरू शकत नाही," असे म्हणत श्रीसंतने हरभजनशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले आणि त्याला इन्स्टाग्रामवर ब्लॉक केले आहे. श्रीसंतच्या मते, हरभजन वारंवार मुलाखतींमध्ये या घटनेबद्दल पश्चात्ताप व्यक्त करतो, मात्र दुसरीकडे त्याच घटनेतून पैसे कमावण्याचा प्रयत्न करतो. हा त्याचा दुटप्पीपणा आहे.
'थप्पडकांड' मध्ये नेमके काय घडले होते?
२००८च्या पहिल्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्सविरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब सामन्यानंतर हरभजनने श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर श्रीसंत मैदानात रडताना दिसला होता. या घटनेमुळे हरभजनवर आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली होती. गेल्या काही वर्षांत दोघांमधील संबंध सुधारल्याचे दिसत होते, मात्र या नव्या जाहिरातीमुळे हा जुना वाद आता पुन्हा एकदा पेटला आहे.