Air India नंतर आता ‘या’ कंपनीचे खासगीकरण; मोदी सरकार १४ हजार कोटी उभारणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2021 10:04 AM2021-10-11T10:04:03+5:302021-10-11T10:07:27+5:30

Air India ची उपकंपनी असलेल्या एका कंपनीची केंद्र सरकारच्या तोट्यातील मालमत्ता आणि सार्वजनिक उपक्रमांच्या विक्रीअंतर्गत विक्री केली जाणार आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून Air India च्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू होती. अखेर TATA ची हीट ठरली असून, पुन्हा एकदा Air India ची घरवापसी होत आहे. लवकरच Air India च्या TATA कडील हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Air India लिलावानंतर आता केंद्र सरकारने इतर सरकारी कंपन्या आणि महामंडळे यांची विक्री करण्यासाठी कंबर कसली आहे. एअर इंडिया समूहातील अलायन्स एअर या सरकारी कंपनीची देखील लवकरच विक्री केली जाणार आहे.

नुकताच सिंधुदुर्गातील चिपी विमानतळाचे उदघाट्न झाले. या विमानतळाला अलायन्स एअर या कंपनीची सेवा सुरु आहे. मात्र याच सरकारी कंपनीची देखील एअर इंडियाप्रमाणे विक्री करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

केंद्र सरकारच्या तोट्यातील मालमत्ता आणि सार्वजनिक उपक्रमांच्या विक्रीअंतर्गत अलायन्स एअर देखील विक्री केली जाणार आहे. अलायन्स एअर ही एअर इंडियाची उपकंपनी आहे.

अलायन्स एअरकडे १९ एटीआर विमाने असून ४८ ठिकाणी सध्या कंपनीची विमान सेवा सुरु आहे. २०२० या आर्थिक वर्षात अलायन्स एअरला २०१ कोटींचा तोटा झाला होता. तर ६५.०९ कोटींचा परिचालन नफा झाला होता.

केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत सेवेसाठी ही कंपनी चांगले योगदान देत आहे. नुकताच सरकारने अलायन्स एअरची श्रीलंकेसाठी सेवा सुरु केली होती. तसेच पूर्वोत्तर आणि ईशान्य भारतात तोट्यातील मार्गांवर देखील ही कंपनी विमान सेवा देत आहे.

अलायन्स एअरची स्थावर मालमत्ता जसे की कार्यालय इमारत आणि अन्य काही मालमत्ताची विक्री करून किमान १४ हजार ७०० कोटी सरकारला मिळू शकतात. तसेच कंपनीचा ग्राउंड हँडलिंग विभाग आणि अभियांत्रिकी विभागाची विक्री करून किमान २ हजार कोटीचा महसूल मिळू शकतो, असे या प्रस्तावाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे.

दरम्यान, तब्बल ६८ वर्षांनंतर TATA समूहाला मालकी हक्क प्राप्त झालेल्या एअर इंडियाचे टाटा समूहाचे मानद अध्यक्ष RATAN TATA यांनी स्वागत केले आहे. TATA समूहाचे द्रष्टे नेतृत्व असलेल्या जेआरडी टाटा यांच्या कारकिर्दीत एअर इंडियाला मिळालेले गतवैभव पुन्हा प्राप्त करु, असा आशावाद रतन टाटा यांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारकडून Air India साठी यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीची घोषणा करण्यात आली. TATA सन्सचा १८ हजार कोटींचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. या वृत्तानंतर रतन टाटा यांनी ट्विट करून एअर इंडिया पुन्हा स्वगृही आल्याबद्दल स्वागत केले.

TATA समूहाकडून १८ हजार कोटींना Air India खरेदी करण्यात आली आहे. त्यापैकी १५ टक्के रक्कम केंद्र सरकारला मिळणार असून, उर्वरित रक्कम कर्ज फेडीसाठी वापरली जाणार आहे. रतन टाटा यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.