दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक त्या उपाययोजना राबविणार; दत्तात्रय भरणे यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2026 10:32 IST2026-04-21T10:31:48+5:302026-04-21T10:32:00+5:30
यंदा पाऊस सरासरीच्या ९२ टक्के पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे

दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यास आवश्यक त्या उपाययोजना राबविणार; दत्तात्रय भरणे यांची माहिती
पुणे : “खरीप हंगामात सुमारे १४५.२० लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचा अंदाज आहे. यावर्षी बियाण्यांची गरज २०.१७ लाख क्विंटल असून २८.०५ लाख क्विंटल (१३९%) बियाणे उपलब्ध आहे. तसेच भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार यंदा पाऊस सरासरीच्या ९२ टक्के पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी थोड्याफार प्रमाणात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याचे काम कृषी विभागामार्फत सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
खरीप हंगामाच्या नियोजन कार्यशाळेनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “शेतकऱ्यांना कर्जमाफी ३० जूनच्या मिळणार आहे. या कर्जमाफीसंदर्भातील शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचे व निकष ठरवण्याचे काम अंतिम टप्प्यावर आहे. आगामी खरीप हंगाम २०२६ च्या अनुषंगाने राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. या कार्यशाळेत खरीप हंगामासाठी करण्यात आलेल्या पूर्वतयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. येत्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाणे वेळेत आणि पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी आवश्यक त्या सूचना विभागास दिल्या आहेत.”
यावर्षी बियाण्यांची गरज २०.१७ लाख क्विंटल असून २८.०५ लाख क्विंटल (१३९ टक्के) बियाणे उपलब्ध आहे. तसेच राज्यास ४८.८० लाख टन खतांचा कोटा मंजूर असून आतापर्यंत २५.१७ लाख टन खते उपलब्ध आहेत. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे व खतांची टंचाई होणार नाही. तसेच खतांच्या आणखी मागणीसंदर्भात केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा देशातील पर्जन्यमान हे सरासरीच्या ९२ टक्के इतके राहण्याची शक्यता असून ‘एल निनो’ स्थितीमुळे पावसात अनियमितता व दुष्काळ परिस्थिती उद्भवू शकते. या पार्श्वभूमीवर उपाययोजना होत आहेत.
नैसर्गिक आपत्तीमुळे फेब्रुवारी २०२५ पासून आतापर्यंत राज्यातील १३६.२८ लाख शेतकऱ्यांचे १०५.८८ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना २० हजार १९६ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच नुकतेच मार्च व एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे २ लाख १५ हजार हेक्टर नुकसान झाले असून त्यातील बाधित शेतकऱ्यांना मदतीसाठी नुकसानभरपाईचे शासन निर्णय निघाले आहेत, तसेच मागील आठवड्यात पडलेल्या अवकाळी पावसाचे पंचनामे सुरू असल्याची भरणे यांनी माहिती दिली.