महापालिकेचा झेंडा फडकला'माऊंट एव्हरेस्ट'वर, मोहिमेस 60 लाखांचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 11:13 PM2021-06-06T23:13:22+5:302021-06-06T23:26:11+5:30

खरं तर या मोहिमेला हर्षवर्धनची जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास पाहूनच त्याच्या घरच्यांनी व मित्रांनी व महापालिका प्रशासनाने त्याला मदतीचा हात दिला.

वसईत राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणाने जगातील सर्वोच्च शिखर असलेलं "माउंट एव्हरेस्ट" हे नव्या उंचीचं शिखर नुकतेच सर केल असून खास म्हणजे या संपूर्ण मोहीमेत लागणारी काही साहित्य ही इकोफ्रेंडली स्वरूपाची होती.

मूळचा महाराष्ट्र राज्यातील पालघर जिल्ह्याच्या वसई तालुक्यातील नवघर माणिकपूर शहरांतील दिवाणमान येथील हर्षवर्धन जोशी (25) याने ऐन कोविड-19 च्या महामारीत ही धाडसी कामगिरी करुन दाखवली.

भारतमातेच्या झेंड्यासोबत वसई विरार शहर महानगरपालिकेचा झेंडा देखील त्यानं या माऊंट एव्हरेस्ट शिखरावर फडकविला. त्यामुळे, वसईचे नाव आता एव्हरेस्टवर लिहिले गेलं आहे.

हर्षवर्धन जोशी (25) हा आय टी इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना व या मोहिमेत त्याला कोविडने ग्रासले असताना त्यावर ही मात करून त्याने ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील जीवघेणी मोहीम यशस्वीरित्या पार पाडली.

वसईकरांनी व खास करून दिवाणमान गावातील लोकांनी त्याचे जंगी स्वागत केलं. सातोरी एडव्हेंचर एव्हरेस्ट अभियान यांच्यातर्फे मार्च 2021 मध्ये ही तीन सदस्य असलेली एव्हरेस्ट शिखर मोहीम राबवण्यात आली होती.

यात अभियान निदेश प्रबंधक ऋषी भंडारी यांच्या सांगण्यानुसार, या तीन सदस्यांमध्ये हर्षवर्धन जोशी, नेपाळी फुर्ते शेरपा आणि अनुप राय यांचा समावेश होता.

हर्षवर्धन हा आधीपासूनच गिर्यारोहक म्हणून वसई कराना परिचित होता तर आपण माऊंट एव्हरेस्ट सर करायचे त्याचे हे जुने स्वप्न होते आणि यासाठी आर्थिक पाठबळ ही भरपूर प्रमाणात लागणार होतं.

तरीही त्यानं जिद्दीने यासाठी स्वतःची बचत केलेली रक्कम, मित्र, काही कंपनी, नातेवाईक तसेच वसई विरार शहर महानगरपालिका यांनाही मदतीसाठी आवाहन केले होते.

30 मार्च रोजी हर्षवर्धन जोशीने वसईवरून नेपाळ देशासाठी प्रवास सुरू केला आणि प्रत्यक्षात 6 एप्रिल 2021 ला त्याने माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यास सुरुवात केली.

हे सर्वोच्च शिखर सर करताना त्याला कोरोना ने गाठलं आणि आठ दिवस बेस कॅम्प मध्ये तंबूत स्वतः ला आयसोलेशन मध्ये ठेवून त्यावर त्याने यशस्वी मात ही केली

अखेर तो दिवस उजाडला आणि दि 23 मे 2021 रोजी सकाळी हर्षवर्धनने ही आतंरराष्ट्रीय एव्हरेस्ट अभियान मोहीम पूर्ण करत प्रथम भारताचा झेंडा फडकवला.

हर्षवर्धनने वसई विरार महापालिकेचाही झेंडा या जगातील (8848.00 मीटर ) या सर्वोच्च शिखरावर फडकवत हर्षवर्धनने त्याचे माउंट एव्हरेस्ट सर करण्याचे अद्वितीय स्वप्न अखेर पूर्ण केलं.