बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 05:50 IST2026-04-30T05:49:39+5:302026-04-30T05:50:12+5:30
केरळमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता, यूडीएफला जास्त जागा मिळण्याकडे कल; आसाममध्ये भाजप करणार हॅट्-ट्रिक, पुद्दुचेरीमध्ये पुन्हा येणार एनडीएचे सरकार

बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल पाच दिवसांवर असून बुधवारी जाहीर झालेल्या एक्झिट पोलमध्ये पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूलमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळेल आणि भाजपच्या कमळावर बंगालची 'ममता' दिसेल, असा अंदाज तीन संस्थांनी वर्तविला आहे. प्रत्यक्षात असे झाले तर पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रथमच सत्तेत येईल. तामिळनाडूमध्ये मात्र द्रमुकच पुन्हा बाजी मारेल असे चित्र आहे.
केरळमध्ये सत्ता परिवर्तन होऊन यूडीएफ सत्तेत येईल, तर आसाममध्ये भाजप हॅट्-ट्रिक करेल आणि पद्दुचेरीमध्ये एनडीएचेच पुन्हा सरकार येईल, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला आहे. प. बंगालमध्ये सत्तांतरासाठी भाजपने मोठी ताकद पणाला लावली होती. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमध्ये अनेक सभा घेतल्या. रोड-शोही आयोजित केले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही एसआयआरनंतर भाजपवर अनेक आरोप करत टक्कर दिली. काँग्रेसला येथे फार यश मिळण्याची शक्यता नाही.
तामिळनाडूमध्ये मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्या द्रमुकला मतदारांनी पसंती दिल्याचे एक्झिट पोल सांगतात. अण्णाद्रमुकला फारसे यश मिळेल असे दिसत नाही. अभिनेता विजय यांचा टीव्हीके पक्ष खाते उघडून चांगल्या जागा मिळवेल, असा अंदाज आहे. जवळपास सर्व संस्थांनी केरळमध्ये सत्ताधारी डाव्या लोकशाही आघाडीचे (एलडीएफ) पतन व काँग्रेसच्या नेतृत्वातील संयुक्त लोकशाही आघाडीचा (यूडीएफ) विजय होईल, असा अंदाज वर्तवला आहे. बहुतेक सर्वेक्षणांनुसार, पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील एनडीए आघाडी बहुमत मिळवेल, असा अंदाज आहे.
पश्चिम बंगालमध्ये उच्चांकी ९२% मतदान
संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा दुसरा आणि अंतिम टप्पा पार पडला असून, बुधवारी रात्री ७:४५ पर्यंत तब्बल ९१.६६ टक्क्यांहून अधिक मतदान झाले. पहिल्या टप्प्यात ९३.१९ टक्के विक्रमी मतदान झाले होते. दोन्ही टप्प्यांमधील एकूण मतदानाची सरासरी ९२.४७ टक्क्यांवर पोहोचली आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पश्चिम बंगालमध्ये नोंदवले गेलेले हे आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.
ममता बॅनर्जी यांच्या भवानीपूरकडे लक्ष
राज्यातील राजकीय लढाईच्या केंद्रस्थानी 'भवानीपूर' हा मतदारसंघ होता. हा मतदारसंघात ममता बॅनर्जी यांचा सामना विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांच्याशी झाला. ही लढाई म्हणजे प्रतिष्ठेची लढाई होती यात कोण बाजी मारणार, हे ४ मे रोजी स्पष्ट होईल.