"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2026 06:38 IST2026-04-30T06:38:30+5:302026-04-30T06:38:55+5:30
अतिश यांनीच रिक्षा थांबवून चव्हाण यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्याकडील मोबाईल त्यांच्याच बोटाने उघडून कुटुंबियांशी संपर्क साधला.

"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी"
मुंबई- मुंबईच्या रात्रीत नेहमीप्रमाणे गाड्यांचा आवाज, दिव्यांची चकाकी आणि धावपळीचा वेग होता. पण त्या रात्रीचा एका क्षणाने आयुष्यभरासाठी अंगावर काटा आणणारी आठवण कोरल्याचे मानखुर्द येथील क्रेन अपघातून थोडक्यात बचावलेले अतिश करंजावणे यांनी सांगितले. ते रात्री नवी मुंबईला राहणाऱ्या मामांकडे दुचाकीवरून निघाले. त्यांच्या पुढे अवघ्या १० फुटांच्या अंतरावर या अपघातात बळी ठरलेले पोलिस संतोष चव्हाण होते. त्याचदरम्यान अचानक क्रेन कोसळली. त्यांच्या मागे माझाच नंबर होता, जणू मृत्यूला स्पर्श करून परतलो असेही त्यांनी सांगितले.
चव्हाण यांच्या मागे माझाच नंबर होता : करंजावणे हे वरळी कोळीवाडाचे रहिवासी आहे. ते खासगी कंपनीत नोकरीला आहे. ते दुचाकीवरून नवी मुंबईला राहणाऱ्या मामांकडे निघाले होते. त्यादरम्यान हा अपघात घडला. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण यांच्या मागे माझाच नंबर होता. मी दहा फुटांवर होतो. अचानक कुठलीही सुरक्षेची खबरदारी न घेता उभी केलेली क्रेन खाली कोसळली. तिला धडकून चव्हाण यांचा मृत्यू झाला. श्वास रोखला गेला. डोळ्यांसमोर अंधार दाटून आला.
‘विकासाच्या नावाखाली जातोय बळी
अतिश यांनीच रिक्षा थांबवून चव्हाण यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात नेले. तेथे त्यांच्याकडील मोबाईल त्यांच्याच बोटाने उघडून कुटुंबियांशी संपर्क साधला. अखेरला पत्नीचाच नंबर डायल केलेला दिसून आला. त्यावर संपर्क साधून त्यांना अपघाताची माहिती दिली. तसेच मोबाईल उघडल्यानंतर त्यातील क्रमांक बघून चव्हाण हे पोलिस असल्याचे समजल्याचेही त्यांनी सांगितले. हा विकासाचा बळी आहे. विकासाच्या नावाखाली कुणाचा ना कुणाचा बळी जात आहे. रस्त्यावर चालणेही अवघड झाल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे संबंधितावर कठोर कारवाई करत सुरक्षेची विशेष खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.