रामदास आठवलेंचा आनंद गगनात मावेना! पहिल्यांदाच RPI चे २ आमदार विजयी झाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 02:09 PM2023-03-02T14:09:42+5:302023-03-02T14:14:09+5:30

महाराष्ट्रात कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीचे निकाल आले आहेत. या निकालात भाजपाचा गड मानला जाणाऱ्या कसबा पेठेत २८ वर्षांनी इतिहास घडला. येथे काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाच्या हेमंत रासने यांचा पराभव केला.

महाराष्ट्रातील या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. पण दुसरीकडे ईशान्येकडील निवडणुकांचे निकालही समोर आले आहेत. या निवडणुकीचा निकाल रामदास आठवलेंना आनंद देणारा ठरलेला आहे.

कारण या निवडणुकीच्या निकालामुळे पहिल्यांदाच रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने विधानसभेत प्रवेश केला आहे. आठवलेंच्या आरपीआय पक्षाचे २ उमेदवार नागालँडमध्ये विजयी झाले आहेत.

पहिल्यांदाच आरपीआय आठवले गटाच्या २ उमेदवारांनी महाराष्ट्राबाहेर विधानसभेत गुलाल उधळला आहे. नागालँडमध्ये भाजपा-एनडीपीपी आघाडीवर असून आठवलेंच्या २ विजयी उमेदवारामुळे आरपीआय कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

नागालँड विधानसभेच्या एकूण ६० मतदारसंघांसाठी निवडणूक पार पडली. याठिकाणी आज मतमोजणी सुरू आहे. तिथे सत्ताधारी NDPP-BJP युतीने आतापर्यंत पाच जागा जिंकल्या आहेत (NDPP - ३, भाजप - २) तर एनडीपीपी आणि भाजपा निवडणुकीत सुमारे ३० जागांवर आघाडीवर आहे.

६० पैकी ५५ जागांवरील ट्रेंडनुसार, ४०:२० जागा वाटप करारावर भाजपसोबत युती करून निवडणूक लढवणारा राष्ट्रवादी लोकशाही पुरोगामी पक्ष २० जागांवर पुढे आहे. दुसरीकडे भाजपा सध्या १० जागांवर आघाडीवर आहे. तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने (आठवले)ही २ जागा जिंकल्या आहेत.

२०१८ च्या निवडणुकीत NDA चा घटक पक्ष असलेल्या नॅशनलिस्ट डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह पार्टीने १८ जागांवर विजय मिळवला होता. त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्याने त्यांनी सरकार स्थापन केले. नागा पीपल्स फ्रंटला २५ जागा जिंकूनही सरकार बनवता आले नव्हते.

रामदास आठवले हे मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये राज्यसभेतून महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गटाचे अध्यक्ष आहे. तर केंद्रात राज्यमंत्रीपद सांभाळतात. २०१४ पासून ते भाजपासोबत मित्रपक्ष म्हणून सहभागी आहेत.