Coronavirus: कुठे कर्फ्यू तर कुठे शाळा बंद, मुंबईत पुन्हा खबरदारी; पुन्हा सुरु झाली लॉकडाऊनची तयारी?

By प्रविण मरगळे | Published: November 20, 2020 03:16 PM2020-11-20T15:16:58+5:302020-11-20T15:20:42+5:30

अनलॉक अंतर्गत, केंद्र सरकारने पहिल्या टप्प्यात ९ ते १२ त्यानंतर सर्व शाळा उघडण्यास परवानगी दिली होती. महाविद्यालये आणि विद्यापीठांनाही वर्ग घेण्यास परवानगी आहे. अशा परिस्थितीत काही राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये शाळा उघडल्या गेल्या परंतु कोरोनाशी संबंधित खबरदारी घेतल्या तरी वाढत्या कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

शाळा सुरू करण्याचा निर्णय गुजरातने पुढे ढकलला आहे. मिझोरम, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हरियाणा येथील शाळा पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. केंद्राची सूट असूनही महाराष्ट्र सरकारने ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढविला होता. म्हणजेच उर्वरित राज्यांइतके अनलॉक नसलं झालं तरी राज्यात आवश्यक आणि सामान्य कामांसाठी सूट आहे.

लॉकडाऊन पुन्हा होईल का? हा प्रश्न लोकांच्या मनात पडला आहे, कारण गेल्या काही दिवसांत अशीच चिन्हे दिसू लागली आहेत. कोविड -१९ च्या नव्या रुग्णांमध्ये घट होत असली तरी अद्यापही काही ठिकाणी परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. नोव्हेंबर महिन्यात रुग्ण घटण्याऐवजी वाढतच चालली आहे. अशा परिस्थितीत काटेकोरपणे नियमांचे पालन होणं आवश्यक झालं आहे.

शुक्रवारी रात्री ते सोमवार सकाळपर्यंत गुजरातच्या अहमदाबादमध्ये 'फुल कर्फ्यू' लागू करण्यात आला आहे. दिल्ली सरकारनेही कडक अंमलबजावणी सुरु केली आहे. त्याचबरोबर काही राज्यांनी रुग्णसंख्या वाढत असल्याने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये हरियाणा, उत्तराखंड, मिझोरम, हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांचा समावेश आहे.

अशा परिस्थितीत देशव्यापी नसला तरी स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कंटेन्ट झोनमध्ये पूर्णपणे लॉकडाऊन होण्याची शक्यता आहे परंतु अत्यंत मर्यादित क्षेत्रात लागू शकते. गुजरातच्या अहमदाबाद महानगरपालिका हद्दीत येणारा परिसरात शुक्रवार रात्रीपासून ५७ तासांचा कर्फ्यू लावण्यात आला आहे.

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, शुक्रवार (२० नोव्हेंबर) रात्री ९ वाजता कर्फ्यू सुरू होईल, जो सोमवारी (दि. २३) सकाळी सहा पर्यंत सुरू राहणार आहे. अतिरिक्त मुख्य सचिव राजीव कुमार गुप्ता म्हणाले की, या “पूर्ण कर्फ्यू” दरम्यान फक्त दूध व औषधांची दुकानेच खुली राहतील. गुजरात सरकारने २३ नोव्हेंबरपासून राज्यात माध्यमिक शाळा आणि महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णयही थांबविला आहे.

अरविंद केजरीवाल सरकारने कोरोना हाताळण्याबाबत कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना २००० रुपयांचा दंड जाहीर केला आहे. आतापर्यंत मास्क न घातल्याबद्दल ५०० रुपयांच्या दंडाची तरतूद होती. सर्वपक्षीय बैठकीनंतर केजरीवाल यांनी याची घोषणा केली.

दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट सुरु आहे. या व्यतिरिक्त दिल्ली सरकारनेही केंद्राला स्थानिक पातळीवर बाजारात लॉकडाऊन लागू करण्याची परवानगी देण्यास सांगितलं आहे. मात्र, दिल्लीत लॉकडाऊन करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले. दिल्लीत विवाहसोहळ्यांमधील उपस्थिती २०० वरुन ५० वर करण्यात आली आहे.

माइक्रो कंटेन्ट झोनमध्ये कठोरपणा केला जात आहे. ही पद्धत देशभर अवलंबली जात आहे. जेथे एक नवीन रुग्ण आढळले आहे, तेथे ५० मीटरच्या परिसरात आयसोलेशन करण्याचा प्रयत्न केला जातो. तसेच राज्यांत घरोघरी जाऊन कुटुंबाची चाचणी करण्याचेही कामही सुरु आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरु करण्यात येणार आहे, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने ३१ डिसेंबरपर्यंत महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर स्थानिक प्रशासन शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घेईल असं शालेय शिक्षण विभागाने सांगितले आहे.

Read in English