Coronavirus Astrology : ज्योतिषशास्त्रावर विश्वास आहे?; मग, कोरोना संकटाबाबतचं ‘हे’ महत्त्वाचं भाकित वाचाच!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 06:26 PM2020-05-11T18:26:55+5:302020-05-11T19:19:15+5:30

कोरोनाच्या दुष्टचक्रातून आपली सुटका कधी होणार?, हा प्रश्न आज सगळ्यांनाच पडलाय. प्रत्येक जण वेगवेगळे फॉर्म्युले वापरून समीकरणं मांडत आहेत, पण हे गणित सोडवणं भल्याभल्यांनाही अवघड जातंय. भारतात आजघडीला 67 हजारांहून अधिक जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी, 20 हजार 917 जण बरे झालेत, तर 2 हजार 206 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधितांचा वाढत जाणारा आकडा हा चिंतेचं कारण ठरतोय. कोरोनासोबत जगायची सवय करून घ्या, असं बरेच जण म्हणू लागलेत. ते पूर्णपणे चूकही नाही, पण प्रत्येकाच्या मनात भीतीचं वातावरण आहे. कुठल्याही मार्गाने का होईना, हे कोरोनाचं संकट दूर व्हावं, हीच सगळ्यांची इच्छा आहे.

एकीकडे कोविड-19 च्या लसीवर, औषधावर संशोधन सुरू असतानाच, ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास करणाऱ्या ज्योतिष्यांनी एक 'कुंडली' मांडली आहे. कोरोनापासून सुटका होण्यासाठी आणखी चार महिने वाट पाहावी लागेल, असा त्यांचा अंदाज आहे.

ज्योतिष आध्यात्मिक शोध संस्थानचे संचालक आचार्य वैदिक रामचंद्र शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोना विषाणूचं संकट दूर होऊ शकतं. त्यामागचं 'शास्त्र' त्यांनी 'इंडिया टुडे' वेबसाईटला सांगितलं.

24 जानेवारी रोजी शनिनं मकर राशीत प्रवेश केला. त्यानंतर 22 मार्चला मंगळाचा आणि 29 मार्चच्या रात्री गुरूचा मकरेत प्रवेश झाला. सर्वसाधारणपणे गुरू एका राशीमध्ये 13 महिने थांबतो, पण यावेळी त्यानं हा प्रवास पाच महिन्यात पूर्ण केला.

गुरू ग्रहाचा एका वर्षात तीन नक्षत्रसमूहांना स्पर्श झाल्यास महामारी आणि गंभीर आर्थिक संकटाचा धोका असतो, असं ज्योतिषशास्त्रात म्हटलं आहे. मात्र, मंगळाचा मकर राशीतून कुंभ राशीत होणारा प्रवेश ही काहीशी दिलासा देणारी बाब आहे.

14 मे आणि 22 जूनदरम्यान जगातील वैज्ञानिकांना कोरोनावर काहीतरी औषध सापडण्याचे संकेत ग्रह-तारे देत आहेत. 30 जून रोजी गुरू धरू राशीत प्रवेश करेल आणि जागतिक पातळीवर एक सकारात्मक वातावरण दिसू लागेल, असं आचार्य रामचंद्र शर्मा यांचं म्हणणं आहे.

गुरूच्या धनु राशीतील प्रवेशानंतरही, 13 सप्टेंबरपर्यंत थोडा प्रतिकूल काळ आहे. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस हे कोरोना संकटाचीही अखेर होईल, असा अंदाज आहे.

कोरोना व्हायरसविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी लॉकडाऊनचे, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळणं, ठरावीक वेळेनं हात धुणं, पौष्टिक खाणं, रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं हे आपण प्रत्येकानेच करत राहायला हवं.