पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2026 12:56 IST2026-04-28T12:55:23+5:302026-04-28T12:56:23+5:30
Ali Pervaiz Malik on India oil reserve: पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी भारताच्या ऑईल रिझर्व्ह क्षमतेचे कौतुक करत पाकिस्तानच्या ऊर्जा संकटावर भाष्य केले आहे. अमेरिकेने इराण आणि रशियावर लावलेल्या निर्बंधांमुळे पाकिस्तानमध्ये इंधन टंचाई निर्माण झाली आहे.

पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
आर्थिक गर्तेत सापडलेल्या पाकिस्तानची अवस्था आता इतकी बिकट झाली आहे की, देशात एक दिवसाचाही अतिरिक्त पेट्रोल साठा शिल्लक राहिलेला नाही. पाकिस्तानचे पेट्रोलियम मंत्री अली परवेझ मलिक यांनी भारताच्या धोरणात्मक नियोजनाचे कौतुक करत स्वतःच्या देशाच्या रिकाम्या तिजोरीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
आर्थिक डबघाईला आलेल्या पाकिस्तानसमोर आता सर्वात मोठे ऊर्जा संकट उभे ठाकले आहे. पाकिस्तानचे अर्थ राज्यमंत्री अली परवेझ मलिक यांनी एक गंभीर इशारा देताना सांगितले की, देशातील कच्च्या तेलाचा साठा चिंताजनक पातळीवर पोहोचला आहे. पाच ते सहा दिवसांचेच कच्चे तेल उरले आहे. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर देशाची ऊर्जा यंत्रणा पूर्णपणे कोलमडून पडू शकते. मलिक यांच्या मते, पाकिस्तानची सर्वात मोठी अडचण परकीय चलन साठ्याची टंचाई ही आहे. डॉलर्सच्या कमतरतेमुळे पाकिस्तान आंतरराष्ट्रीय बाजारातून पुरेसे तेल खरेदी करू शकत नाहीये. यामुळे तेलाच्या आयातीला विलंब होत असून साठा संपण्याच्या मार्गावर आहे.
भारताशी तुलना: "एक सही आणि ६० दिवसांचे तेल!"
मलिक यांनी भारताच्या 'ऑईल रिझर्व्ह' क्षमतेचे उदाहरण देत म्हटले की, "पाकिस्तानकडे तेल साठवण्याची कोणतीही ठोस यंत्रणा नाही. आम्ही भारतासारखे सक्षम नाही. भारत एका स्वाक्षरीने आपल्या राखीव साठ्यातून ६०-७० दिवसांचे तेल काढू शकतो. मात्र, पाकिस्तानकडे जागतिक धक्क्यांना सहन करण्याची रत्तीभरही क्षमता उरलेली नाही."
पाकिस्तान काही झाले तरी भारताकडे मदत मागणार नाही. भारत भुतान, नेपाळ, बांगलादेशसह श्रीलंकेसारख्या आपल्या शेजारी राष्ट्रांना इंधन पुरवितो. परंतू, पाकिस्तान हा शत्रू असल्याने भारताचा पाकिस्तानसोबत तसा कोणताही व्यवहार नाही. तसे पाहिल्यास गुजरातची रिफायनरी ही पाकिस्तानपासून अगदी जवळ आहे. काही तासांत भारत लाखो लीटर कच्चे तेल किंवा पेट्रोल, डिझेल पोहोच करू शकतो. परंतू, दोन्ही देशांतील संबंध पाहता ते शक्य नाही.
अमेरिकेची 'नाकेबंदी' आणि रशिया-इराण फॅक्टर
पाकिस्तानच्या अडचणींमध्ये भर पडण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अमेरिकेचे कडक धोरण. अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट यांनी स्पष्ट केले आहे की, रशिया आणि इराणच्या तेलावर दिलेली सवलत आता वाढवली जाणार नाही. अमेरिकेने इराणवर प्रभावी नाकेबंदी केल्यामुळे तिथून होणारा तेल पुरवठा पूर्णपणे ठप्प झाला आहे. रशियाकडून मिळणारे स्वस्त तेलही आता पाकिस्तानच्या आवाक्याबाहेर जाणार आहे.
रिफायनरी बंद होण्याच्या मार्गावर
कच्च्या तेलाच्या कमतरतेमुळे पाकिस्तानमधील तेल शुद्धीकरण कारखाने बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे. जर पुरवठा सुरळीत झाला नाही, तर देशातील वाहतूक आणि वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडून पडेल, असा इशारा स्वतः मंत्र्यांनी दिला आहे.