पुलेला गोपीचंद... सायना, सिंधू, श्रीकांतसारखे बॅडमिंटनपटू घडवणारे गुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 12:04 PM2018-09-05T12:04:41+5:302018-09-05T12:07:39+5:30

आशियाई क्रीडा स्पर्धेत सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी ऐतिहासिक पदक जिंकून पुन्हा एकादा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे नाणे खणखणीत वाजवले. 1982नंतर आशियाई स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये एकेरीत पदक जिंकणारी सायना ही पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. सिंधूने त्या पलिकडे झेप घेत आशियाई स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचा मान पटकावला. सायना व सिंधू यांनी अनुक्रमे कांस्य व रौप्यपदकाची कमाई केली. पण, त्यांच्या या यशामागे गुरु पुलेला गोपीचंद यांचा सिंहाचा वाटा आहे. शिक्षक दिनानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीवर टाकलेला हा दृष्टीक्षेप...

खेळाडू म्हणून गोपीचंद यांचे देशासाठी योगदान बहुमुल्य आहे. प्रकाश पदुकोन यांच्यानंतर ऑल इंग्लंड अजिंक्यपद स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम त्यांनी केला आहे. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी प्रशिक्षकाची भूमिका स्वीकारली.

बॅडमिंटन हे गोपीचंद यांचे पहिले प्रेम नाही, तर क्रिकेट आहे. मात्र मोठा भावाने गोपीचंद यांना रॅकेटच्या प्रेमात पाडले. गोपीचंद यांनी प्रकाश पदुकोन अकादमीत बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेतले.

बॅडमिंटन अकादमीसाठी गोपीचंद यांनी स्वतःचे घर गहाण ठेवले आणि सर्व बचत खर्ची घातली. अथक मेहनतीनंतर त्यांना एका उद्योजकाने साथ दिली. 2009 मध्ये त्यांना द्रोणाचार्य पुरस्कारानेही गौरवण्यात आले.

गोपीचंद यांनी प्रशिक्षण देणारी फॅक्टरी तयार करण्यापलीकडे आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताला पदक जिंकून देणारे सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू, किदम्बी श्रीकांत असे अनेक खेळाडू त्यांनी घडवले.

गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली शिकलेल्या सायना आणि सिंधू यांनी ऑलिम्पिक स्पर्धेतही पदक पटकावले आले. सायनाने 2012 मध्ये कांस्य, तर सिंधूने 2016 मध्ये रौप्यपदकाची कमाई केली.

घर आणि अकादमी या प्रवासात वेळ वाया जाऊ नये याकरिता त्यांनी अकादमी शेजारीच राहण्याचा निर्णय घेतला. पहाटे चार वाजता गोपीचंद अकादमीत हजर असतात.