सानिया मिर्झाची 'मन की बात'; शोएबसोबत लग्न करण्यामागचं सांगितलं खरं कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 12:30 PM2020-05-28T12:30:02+5:302020-05-28T12:38:26+5:30

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं 2010मध्ये पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकशी विवाह केला.

दोन देशांतील सीमांचा वाद विसरून शोएबशी लग्न करण्याचा निर्णय का घेतला, याचा खुलासा सानियानं नुकत्याच एका मुलाखतीतून केला.

सानियानं नुकतंच पाकिस्तानची क्रीडा पत्रकार झैनाब अब्बास हिच्याशी गप्पा मारल्या. त्यांच्या गप्पांचा व्हिडीओ शोएबनं पोस्ट केला. त्यात सानियानं खुलासा केला. शोएबच्या एका गोष्टीचा प्रचंड राग येत असल्याचा खुलासा सानियानं केला आहे.

सानियानं सांगितलं की,''आम्ही जेव्हा गप्पा मारतो, तेव्हा शोएब जास्त बोलत नाही. विशेषतः आम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीवर वाद किंवा तत्सम चर्चा करतानाही तो काहीच बोलत नाही. त्याला बोलतं करण्यासाठी मला वस्तूंची तोडफोड करावासं वाटतं.''

यावेळी तिची एक सवय शोएबलाही आवडत नसल्याचं, सानियाने सांगितली. ''मी अधीर आहे आणि कदाचित ही गोष्ट त्याला आवडत नसावी,''असं ती म्हणाली. सानियाला तुझं पहिलं क्रश काय, असं विचारलं असता तिनं लगेच बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचं नाव घेतलं.

सानियानं सांगितलं की,''काही महिने एकमेकांना डेट केल्यानंतर मला शोएबनं लग्नाची मागणी घातली. त्यानं भारतात येऊन माझ्या घरच्यांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. तुझं उत्तर हा असेल तर मला सांग, असं तो म्हणाला होता.''

''शोएबच्या बोलण्यात मला खरेपणा जाणवला. तो चांगुलपणाचा आव आणत नसल्याचे मला समजले आणि म्हणून मी त्याला होकार दिला,''असे सानियानं सांगितलं.

शोएबनं गुडघ्यावर बसून सानियाला प्रपोज केलं होतं. अशा फिल्मी स्टाईलनं प्रपोज करणाऱ्यांपैकी तो नाही. पण, तरीही त्यानं सानियासाठी असं केलं. हाच सच्चेपणा सानियाला भावला.

शोएबशी लग्न होण्यापूर्वी सानियानं 2009मध्ये लहानपणीचा मित्र सोहराब मिर्झा याच्याशी साखरपुडा केला होता. पण, दोघांचं नातं तुटलं अन् तिच्या आयुष्यात शोएब आला.

5 महिने एकमेकांना डेट केल्यानंतर 12 एप्रिल 2010मध्ये दोघांनी विवाह केला. आता या दोघांना इझान नावाचा मुलगा आहे.