मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना पेट्रोल, डिझेल, सोने आणि खाद्यतेलाचा वापर विचारपूर्वक करण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनानंतर सर्वसामान्यांच्या मानसिकतेचा आढावा घेणाऱ्या एका सर्वेक्षणातून (लोकल सर्कल) वास्तव समोर आले आहे.
जर इंधन आणि स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती आणखी वाढल्या, तर लोक आपल्या जीवनशैलीत मोठे बदल करण्यास तयार आहेत. वाढत्या इंधनदरांमुळे ७८ टक्के नागरिक सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचा विचार करत आहेत.
महागाईने चिंता वाढवली
इंधनदर वाढीचा परिणाम केवळ वाहनधारकांपुरता मर्यादित राहत नाही. वाहतूक खर्च वाढल्याने अन्नधान्य, भाजीपाला, दूध, बांधकाम साहित्य आणि इतर वस्तूंच्या किमतीही वाढतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर दुहेरी ताण निर्माण होत आहे.
खर्चात कपात अपरिहार्य
एलपीजी सिलिंडर महागल्यास ४४ टक्के नागरिकांनी ‘वापर कमी करू’ असे सांगितले. तर ४० टक्के नागरिकांनी ‘घरचा खर्च कमी करू’ अशी प्रतिक्रिया दिली. यामुळे इंधन महागाईचा परिणाम थेट ग्राहक खर्चावर होत असल्याचे स्पष्ट होत आहे.
