परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 15:03 IST2026-05-10T14:48:10+5:302026-05-10T15:03:05+5:30

जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे स्थान दिवसेंदिवस मजबूत होत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. २०२४ मध्ये परदेशात स्थायिक झालेल्या भारतीयांनी मायदेशी तब्बल १३७ अब्ज डॉलर्स (सुमारे ११.४ लाख कोटी रुपये) पाठवले आहेत.

संयुक्त राष्ट्रांच्या 'इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन' (आयओएम) ने प्रसिद्ध केलेल्या जागतिक स्थलांतर अहवाल २०२६ नुसार, भारत जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश ठरला आहे.

विशेष म्हणजे, १०० अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. भारतापाठोपाठ मेक्सिको, फिलिपिन्स आणि फ्रान्स यांचा क्रमांक लागतो. मात्र, ते भारताच्या आकड्यांच्या जवळपासही नाहीत. २०१० मध्ये भारताला ५३.४८ अब्ज डॉलर्स प्राप्त झाले होते, ज्यात गेल्या १४ वर्षांत दुपटीहून अधिक वाढ झाली आहे.

अमेरिका हा अहवालानुसार, जगातील सर्वाधिक पैसे बाहेर पाठवणारा देश ठरला आहे. अमेरिकेतून १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त रक्कम बाहेर गेली. त्याखालोखाल सौदी, स्वित्झर्लंड व जर्मनीचा क्रमांक लागतो.

भारतातील तंत्रज्ञान क्षेत्राच्या प्रगतीत परदेशातील भारतीयांचा मोठा वाटा आहे. भारताने राबवलेल्या विशेष धोरणांमुळे आणि स्टार्टअप मेंटॉरशिपमुळे आता 'ब्रेन ड्रेन' (बुद्धिमत्तेचे पलायन) थांबून 'ब्रेन गेन' (बुद्धिमत्तेचा लाभ) होत असल्याचे अहवालात नमूद केले आहे.

अहवालात एका चिंताजनक बाबीकडेही लक्ष वेधण्यात आले आहे. २०२४ मध्ये भारतात पूर आणि चक्रीवादळां-सारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे ५० लाखांहून अधिक लोकांचे अंतर्गत विस्थापन झाले आहे. आशिया खंडात विस्थापनाच्या बाबतीत फिलिपिन्सनंतर भारताचा दुसरा क्रमांक लागतो.