बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 15:04 IST2026-05-10T15:03:41+5:302026-05-10T15:04:22+5:30
बूट पळवण्याच्या खेळात पैसे मागणाऱ्या मेहुणीशी नवरदेवाने इतके अभद्र वर्तन केले की, नवरीने नवऱ्याच्या घरी जायला स्पष्ट नकार दिला.

AI Generated Image
लग्नसोहळ्यात मुलीकडच्यांनी नवरदेवाचे बूट लपवणे आणि त्या बदल्यात पैस मागाणे, ही एक खट्याळ परंपरा आहे. मात्र, उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात याच परंपरेने एका हसत्या-खेळत्या लग्नाचा शेवट अत्यंत कडू केला आहे. बूट पळवण्याच्या खेळात पैसे मागणाऱ्या मेहुणीशी नवरदेवाने इतके अभद्र वर्तन केले की, नवरीने नवऱ्याच्या घरी जायला स्पष्ट नकार दिला आणि वऱ्हाडाला रिकाम्या हाताने परत जावे लागले.
ही घटना कासिमाबाद कोतवाली परिसरातील एका गावात घडली. मरदह पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातून राजभर वस्तीत मोठ्या उत्साहात वरात आली होती. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होते. स्वागत झाले, द्वारपूजा झाली आणि वैदिक मंत्रोच्चारात नवरदेव-नवरीने सात फेरेही पूर्ण केले. मात्र, खरा ड्रामा सुरू झाला तो लग्नानंतरच्या 'कोहबर' विधीवेळी.
पैसे मागितले अन् नवरदेवाचा पारा चढला!
परंपरेनुसार, मुलीच्या बहीणींनी नवरदेवाचे जोडे लपवले आणि हक्काने पैशांची मागणी केली. या गमतीशीर वातावरणात नवरदेव अचानक संतापला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, नवरदेवाने केवळ रागावलेच नाही, तर आपल्या मेहुणीला आणि वधू पक्षातील लोकांशी अत्यंत अभद्र आणि हिंसक वर्तन केले. नवरदेवाचा हा रौद्र अवतार पाहून मांडवातील आनंदाचे वातावरण एका क्षणात विरले.
मानसिक स्थितीवर संशय, नवरीचा खंबीर निर्णय
नवरदेवाचा हा स्वभाव पाहून वधू पक्षातील लोकांना धक्काच बसला. "जो माणूस लग्नासारख्या पवित्र सोहळ्यात एका लहानशा विनोदावर इतका भडकू शकतो, तो आपल्या मुलीला भविष्यात कसे सांभाळणार?" असा प्रश्न मुलीच्या कुटुंबीयांनी उपस्थित केला. नवरदेवाच्या मानसिक स्थितीवर संशय व्यक्त करत, नवरीने अशा व्यक्तीसोबत सासरी जाण्यास स्पष्ट नकार दिला.
पोलिसांची मध्यस्थीही ठरली अपयशी
परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना पाचारण करण्यात आले. कासिमाबाद पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र नवरी आपल्या निर्णयावर ठाम होती. अखेर पोलिसांच्या उपस्थितीतच नवरदेवाला आपल्या वऱ्हाडासह नवरीशिवाय गावी परतावे लागले. सध्या नवरदेव पक्षाकडून सामाजिक स्तरावर आणि पोलिसांच्या माध्यमातून पुन्हा समेट घडवून आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.