काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 05:55 IST2026-05-13T05:54:29+5:302026-05-13T05:55:53+5:30
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात उष्णतेची लाट नसली तरी तापमान अधिक असेल.

काळजी घ्या! महाराष्ट्रामध्ये पुढील चार ते पाच दिवस उष्णतेची लाट, कोकणालाही बसणार चटके
मुंबई : मार्च, एप्रिल महिन्यातील उन्हाने नकोसे केले असतानाच आता मे महिनाही त्रासदायक ठरत आहे. पुढील तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात उष्णतेची लाट नसली तरी तापमान अधिक असेल, असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मान्सूनबाबत गुड न्यूज; आठवड्याअखेरीस एंट्री
उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी दक्षिण बंगालचा उपसागर, अंदमान समुद्र आणि अंदमान-निकोबार बेटांवर पोषक वातावरण तयार होत आहे.
या आठवड्या अखेरीस मान्सून अंदमानमध्ये दाखल होण्याची दाट शक्यता आहे. तामिळनाडू, केरळ, कर्नाटकमध्ये पुढील चार-पाच दिवस पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाले असून त्याचा प्रभाव महाराष्ट्रापर्यंत जाणवत आहे. त्यामुळे काही भागांत मेघगर्जनेसह वादळी वारे आणि हलक्या पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.