विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 06:06 IST2026-05-13T06:05:28+5:302026-05-13T06:06:50+5:30
शिरगाव परिसरात मंडल अधिकारी प्रभाकर पाटील आणि आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्यावर मंगळवारी दुपारी भीषण हल्ला झाला.

विरारमध्ये दिवसाढवळ्या थरार! अज्ञातांच्या भीषण हल्ल्यात आरटीआय कार्यकर्ता ठार, मंडल अधिकारी जखमी
नालासोपारा : विरारच्या शिरगाव परिसरात मंडल अधिकारी प्रभाकर पाटील आणि आरटीआय कार्यकर्ते आत्माराम पाटील यांच्यावर मंगळवारी दुपारी भीषण हल्ला झाला. वाळू माफिया किंवा जमीन प्रकरणातील वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज असून आत्माराम यांना यामध्ये प्राण गमवावा लागला. तर प्रभाकर हे मृत्यूशी झुंज देत आहेत.
शिरगाव परिसरातील एका दगडखाणीजवळ ही थरारक घटना घडली. प्रभाकर पाटील आणि आत्माराम हे सरकारी कामाच्या निमित्ताने या परिसरात गेले होते. मात्र, त्याचवेळी तेथे दबा धरून बसलेल्या अज्ञातांनी अचानक त्यांच्यावर लाकडी दांडक्यांनी तुफान हल्ला चढवला. यावेळी त्यांच्या वाहनाचीही मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले.
जखमी प्रभाकर यांची प्रकृती चिंताजनक
हल्ल्यात आत्माराम यांचा जागीच मृत्यू झाला. प्रभाकर हे या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
या घटनेची माहिती मिळताच विरार पोलिस आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ही घटना पूर्वनियोजित असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.
महसूल विभागात संतापाची लाट शिरगाव, विरार परिसरात तणाव
महसूल विभागातील एका जबाबदार अधिकाऱ्यावर दिवसाढवळ्या झालेला हा हल्ला म्हणजे प्रशासकीय व्यवस्थेवर पुकारलेले खुले आव्हान मानले जात आहे.
या घटनेमुळे संपूर्ण महसूल विभागात संतापाची लाट उसळली असून, सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
जमीन, खाण किंवा अवैध खननाशी संबंधित माफियांनी हा सूड उगवला आहे का, या दिशेने आता पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली आहेत.
शिरगाव आणि विरार परिसरात सध्या प्रचंड तणावाचे वातावरण असून, दोषींना लवकरात लवकर बेड्या ठोकण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.