Narendra Modi: "भारत ही संतांची भूमी, अभंगवाणी आपणास प्रेरणा देते"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 04:01 PM2022-06-14T16:01:14+5:302022-06-14T16:36:02+5:30

संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी मोदींनी गायली. भारत हा संतांची भूमी असलेला देश आहे, संतांची शिकवणच आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहे.

श्री क्षेत्र देहू गाव येथील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडला. या लोकार्पण सोहळ्यानंतर पंतप्रधान मोदींनी उपस्थित वारकरी संप्रदायास संबोधित केले.

यावेळी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताई यांसह संतवाणी आणि अभंगांची ओवी मोदींनी गायली. भारत हा संतांची भूमी असलेला देश आहे, संतांची शिकवणच आपल्या देशाला पुढे घेऊन जात आहे. संतांचे अभंग हे सातत्याने आपल्यास प्रेरणा देतात, असे मोदींनी म्हटले.

जे कधीच भंग होत नाही, काळानुसार ते चालतच राहतात, आपले विचार देत राहतात. काळानुसार त्यांच्याकडून आपणास प्रेरणा मिळते ते अभंग असतात, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत ही संतांची भूमी असल्याचे सांगितले.

उच-नीच काही नाही अशी भागवत शिकवण संत तुकाराम महाराजांनी आम्हाला दिली. भागवत भक्तीसाठी दिलेला त्यांनी हा मूलमंत्र राष्ट्रभक्ती आणि समाजभक्तीसाठीही लागू आहे. वारीत महिला भगिंनी मोठ्या आनंदाने सहभागी होतात, असे म्हणत देश महिला सशक्तीकरणासाठी प्रयत्नशील असल्याचेही मोदींनी म्हटले.

जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा ही शिकवण आपल्याला संत तुकारामांनी दिली.

समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचणं, त्यांचं कल्याण हीच शिकवण आपल्याला संतांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातही तुकाराम महाराजांसारख्या संतांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

सावरकरांच्या तुरुंगवासातही ते संत तुकारामांचे अभंग गात होते. म्हणजे, प्रत्येक पिढीला, काळानुरुप संत तुकारामांची शिकवण प्रेरणादायी ठरल्याचं मोदींनी म्हटलं.