तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 19:57 IST2026-04-17T19:47:01+5:302026-04-17T19:57:08+5:30
लोकसभेत घटनादुरुस्ती विधेयक नामंजूर झाले आहे. विरोधकांनी या विधेयकाविरोधात मतदान केले असून हा मोदी सरकारला मोठा झटका मानला जातो.

तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
केंद्रातील मोदी सरकारला आज लोकसभेत मोठा धक्का बसला आहे. अत्यंत चर्चेत असलेले महिला आरक्षण घटनादुरुस्ती विधेयक संसदेत मंजूर होऊ शकले नाही. या विधेयकावरील चर्चा पूर्ण झाल्यानंतर झालेल्या मतदानात सरकारने बहुमत गमावले आणि विधेयक नामंजूर झाले. या निकालानंतर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारवर जोरदार टीका केली आहे.
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
विधेयक नामंजूर झाल्यानंतर संसदेबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. ते म्हणाले, "जेव्हा लोकसभेत हे विधेयक नामंजूर झाले तेव्हा तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का? आम्ही संविधानावरील हा हल्ला यशस्वीपणे हाणून पाडला आहे." गांधी यांनी पुढे असा आरोप केला की, हे केवळ महिला आरक्षणाचे विधेयक नव्हते, तर भारताची राजकीय रचना बदलण्याचा एक सुप्त मार्ग होता, जो आम्ही ओळखला आणि रोखला.
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही या निकालाचे स्वागत करत याला 'लोकशाहीचा विजय' म्हटले आहे. "हा आपल्या देशाच्या एकतेचा आणि लोकशाहीचा मोठा विजय आहे. मी सभागृहात आधीच सांगितले होते की, हे विधेयक म्हणजे संविधानावर केलेला हल्ला होता. तो आम्ही उधळून लावला आहे, ही देशासाठी चांगली गोष्ट आहे," असे त्या म्हणाल्या.
महिला आरक्षण विधेयकावर दिवसभर सभागृहात चर्चा झाली. सत्ताधारी पक्षाला हे विधेयक घटनादुरुस्ती असल्याने विशेष बहुमताने मंजूर करून घेणे आवश्यक होते. मात्र, मतदानावेळी विरोधकांच्या एकजुटीमुळे आणि रणनीतीमुळे आवश्यक आकडा गाठण्यात सरकार अपयशी ठरले.