कोरोनाच्या संकटात "या" राज्याने घेतला मोठा निर्णय; पहिली ते आठवीची शाळा 31 मार्चपर्यंत बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2020 10:25 AM2020-12-05T10:25:15+5:302020-12-05T10:35:31+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचलली जात आहेत. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं.

कोरोनामुळे देशात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 96,08,211वर पोहोचला आहे.

देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 36,652 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 512 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,39,700 लोकांना जीव गमवावा लागला आहे.

वाढत्या संसर्गामुळे मार्च महिन्यापासून देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा-महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

शाळा महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने आता पाऊल उचलली जात आहेत. अनेक राज्यांमध्ये शाळा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शाळा सुरू करणं महागात पडू शकतं.

कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एका राज्याने घेतला मोठा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा ही 31 मार्चपर्यंत बंद असणार आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी पहिली ते इयत्ता आठवी पर्यंतची शाळा मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर इयत्ता 10 वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा होणार आहे.

मध्य प्रदेशात कोरोनामुळे 30 मार्च 2021 पर्यंत शाळा सुरू होणार नाहीत असे सरकारने जाहीर केले आहे. मात्र दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे त्यांचे नियमित वर्ग आता घेण्यात येणार आहेत.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली. त्यामध्ये परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्यांनी शाळा न उघडण्याचे निर्देश दिले. तर 10 वी आणि 12 वीच्या बोर्ड परीक्षा होणार असल्याचं सांगितलं आहे.

शाळा सुरू केल्यानंतर कोरोनाचा धोका वाढला असून 4 पैकी 3 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची लक्षणं दिसून येत नाहीत. मात्र त्यांची चाचणी पॉझिटिव्ह येत आहेत.

दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयाने कोरोना संदर्भात दिलेल्या एका रिपोर्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे. रिपोर्टने पालकांची चिंता वाढवली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

एम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, सर्व पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 40% रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत. यातील 73.5% रुग्ण 12 वर्षांखालील आहे. अशा मुलांमध्ये कोरोना संसर्ग होतो मात्र लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ही मुलं कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे शोधणे फार कठीण आहे.

गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या गाईडलाइन्सनुसार देशातील जवळपास 10 राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश यासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यांचा समावेश आहे.