दौऱ्यातील नेत्यांना एकच सवाल, शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी कधी ओसरणार?

By महेश गलांडे | Published: October 19, 2020 02:43 PM2020-10-19T14:43:32+5:302020-10-19T15:11:15+5:30

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे पूरग्रस्त भागातील पाहणी करत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री पोहचले आहेत, तर बारामतीमधून विरोधी पक्षनेत्यांनी आपला अतिवृष्टी पाहणी दौरा सुरु केलाय.

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं तातडीनं मदत जाहीर करावी. केंद्र सरकार राज्याला सहाय्य करेलच. पण राज्य सरकारनं टोलवाटोलवी न करता आधी मदतीची घोषणा करावी, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान या मुसळधार पावसामुळे झालं असून शेतकऱ्यांकडून राग आणि संताप व्यक्त होत आहे. अद्यापही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी असून पीकं पाण्याखाली गेल्याचं दिसत आहे.

केंद्राची वाट न पाहता राज्य सरकारनं मदत द्यावी. सोयीस्कर भूमिका घेऊ नये. सगळंच केंद्रावर ढकलायचं असेल, तर मग राज्य सरकार कशासाठी आहे, त्यांचं काम काय, असे प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागांची पाहणी करण्यासाठी बारामतीत आले असताना फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दुसरीकडे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही दौऱ्यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं सांगत, शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचं आश्वास दिलंय.

भूकंपाप्रमाणेच यंदा अतिवृष्टीने नुकसान झाल्याचं पवार यांनी सांगितलं, तसेच शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारन मदत करावी, अशी मागणीही केली आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनीही आपल्या मतदारसंघात जाऊन तेथील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केलीय.

मुख्यमंत्र्यांच्या सोलापूर दौऱ्याआधीच वाद निर्माण झाला होता, सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी बोरी नदीच्या पुलावर या असे सांगितले गेले, पण, पुलावरुन नुकसान भरपाईची पाहणी करणार कसं? असा सवाल गावकऱ्यांनी उपस्थित करत मुख्यमंत्री गावात आले तर ठीक, नाहीतर आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती.

सुरक्षेचे कारण देत प्रशासनाने गावकऱ्यांची समजूत काढली त्यानंतर काही गावकऱ्यांना रस्त्यावर बोलवण्यात आले, या लोकांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संवाद साधला.

सांगवी खुर्दच्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी संवाद साधला, यावेळी तुम्ही एकटे नाही, सरकार तुमच्या पाठिशी आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना ग्रामस्थांना दिलासा दिला आहे

मी तुम्हाला दिलासा द्यायला आलो आहे, तुम्ही एकटे नाही, कोणीही वाऱ्यावर पडलं नाही, आपलं सरकार हे तुमचं सरकार आहे, तुमच्या पाठिशी आहे, तुम्हाला धीर द्यायला आलो आहे, काळजी करू नका, नुकसान भरपाई देऊ पण कोणाचेही जीव जाऊ देऊ नका.

सावध राहा, किती नुकसान झालंय याचे पंचनामे सुरु आहे, माहिती गोळा केली जात आहे पण माहिती गोळा करून त्याचा अभ्यास करत बसणार नाही, हे शेतकऱ्यांचे सरकार आहे, लवकरच मदत जाहीर करू असं त्यांनी गावकऱ्यांना सांगितलं आहे.

विरोधी पक्षाने राजकारण करू नये, राज्यातील जनतेला वाऱ्यावर सोडणार नाही, आपत्ती काळात केंद्र आणि राज्य असं काही करू नये, केंद्राकडून राज्याला जे देणं आहे असेल ते केंद्र सरकारने द्यावे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले.

सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सर्वच दिग्गज नेत्यांनी पाहणी दौरे केले आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे. आम्हाला मदत कधी मिळेल.

शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही पावसाचं पाणी दिसतंय, आज आणि उद्या हे पाणी ओसरेलही. पण, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी कधी ओसरणार असा प्रश्न विचारला जात आहे.