Komal Ganatra : संघर्षगाथा! लग्नानंतर १५ व्या दिवशी पतीने सोडलं, लोकांच्या टोमण्यांना दिलं सडेतोड उत्तर, झाली IRS

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2026 16:00 IST2026-05-17T15:53:32+5:302026-05-17T16:00:59+5:30

Komal Ganatra : लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांतच पतीने साथ सोडली होती. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला, पण त्या खचल्या नाहीत.

काही लोक दु:खाला आपली सर्वात मोठी ताकद बनवतात. कोमल गणात्रा यांची गोष्टसुद्धा संघर्ष, आत्मसन्मान आणि यशाचं एक उत्तम उदाहरण आहे. त्यांनी आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांचा सामना केला.

लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांतच पतीने त्यांची साथ सोडली होती. या घटनेने त्यांना मोठा धक्का बसला, पण त्या खचल्या नाहीत. वडिलांनी दिलेल्या एका शिकवणीमुळे त्यांनी आपलं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला.

UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन त्या IRS अधिकारी बनल्या. पतीने केलेल्या फसवणुकीला चोख उत्तर देत कोमल यांनी दु:खालाच आपली ताकद कसं बनवलं आणि IRS पदाला कशी गवसणी घातली ते जाणून घेऊया...

कोमल गणात्रा या मूळच्या गुजरात मधील अमरेली जिल्ह्यातील रहिवासी आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, त्यांचे शालेय शिक्षण गुजराती माध्यमातून झालं होतं. त्यांचे वडील शिक्षक होते.

कोमल अवघ्या ४ वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांनी त्यांना शिकवलं की, मोठं होऊन IAS अधिकारी व्हायचं आहे. त्यांचे वडील मुलांच्या प्रगतीसाठी छोट्या-छोट्या गोष्टींवरही विशेष लक्ष द्यायचे. याच कारणामुळे त्यांनी वेगवेगळ्या विद्यापीठांमधून ३ भाषांमध्ये उच्च शिक्षण पूर्ण केलं.

वडिलांच्या याच शिकवणीने आयुष्य बदलून गेलं. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर त्यांनी सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी सुरू केली होती. तयारी करत असतानाच त्या मुलांना शिकवण्याचे कामही करायच्या. याच काळात त्यांचे लग्न एका NRI तरुणाशी झाले.

लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांतच पती त्यांना सोडून परदेशात निघून गेला. या नात्यात मिळालेल्या फसवणुकीमुळे त्या हादरल्या, पण हार मानण्याऐवजी त्यांनी स्वतःला सावरलं आणि आयुष्यात काहीतरी मोठं करण्याचा निश्चय केला.

या कठीण परिस्थितीत कोमल आपल्या आई-वडिलांच्या घरी परतल्या, पण तिथे लोकांनी टोमणे मारले. शेवटी त्यांनी एका गावात जाऊन राहण्याचा निर्णय घेतला. त्या गावात इंटरनेटची सोय नव्हती आणि इंग्रजी वृत्तपत्रही मिळत नव्हते.

अनेक अडचणी असूनही त्यांनी आपला अभ्यास आणि UPSC ची तयारी सुरूच ठेवली. यासोबतच एका शाळेत शिक्षिकेची नोकरी करून त्यांनी स्वतःला स्वावलंबी बनवलं.

UPSC चा हा प्रवास कोमल यांच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. त्यांनी सलग तीन प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही. वारंवार येणाऱ्या अपयशानंतरही त्यांनी स्वतःवरील विश्वास ढळू दिला नाही. अखेर चौथ्या प्रयत्नात त्यांच्या मेहनतीला यश आले.

२०१२ च्या UPSC परीक्षेत त्यांनी ऑल इंडिया ५९१ वा रँक मिळवला. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर IRS अधिकारी बनण्याचे त्यांचं स्वप्न साकार झाले. अशाप्रकारे त्यांनी पतीची फसवणूक आणि समाजाच्या टोमण्यांना आपल्या यशाने सडेतोड उत्तर दिलं.