उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 07:00 IST2026-05-16T06:57:39+5:302026-05-16T07:00:41+5:30
monsoon 2026: भारतामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत असणाऱ्या पावसाळी हंगामाची अधिकृत सुरुवात मान्सूनच्या केरळ प्रवेशापासून होते.

उकाड्यातून लवकरच सुटका होणार! मान्सून वेळेआधीच येणार, २६ मे रोजीच केरळात ठेवणार पाऊल
नवी दिल्ली : देशभरातील शेतकरी, हवामानतज्ज्ञ आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी नैर्ऋत्य मान्सूनच्या आगमनाची प्रक्रिया यंदा लवकर सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी दिलेल्या अंदाजानुसार, केरळमध्ये २६ मे रोजी नैर्ऋत्य मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.
देशात साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश होतो. त्यानंतर तो टप्प्याटप्प्याने उत्तरेकडे सरकत संपूर्ण देश व्यापतो. जून ते सप्टेंबर या कालावधीत असणाऱ्या पावसाळी हंगामाची अधिकृत सुरुवात मान्सूनच्या केरळ प्रवेशापासून होते.

गेल्या वर्षी मान्सून लवकर दाखल
हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षी केरळमध्ये मान्सूनचा प्रवेश २४ मे रोजी झाला होता.
यंदाही मान्सून नेहमीच्या वेळेपेक्षा काही दिवस आधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने कृषी क्षेत्रासह विविध घटकांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.
भारतीय हवामान विभागाने संभाव्य तारीख २६ मे सांगितली असली तरी मान्सूनचा प्रवेश चार दिवस आधी किंवा चार दिवस उशिराही होऊ शकतो.