कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2026 11:19 IST2026-05-16T11:17:34+5:302026-05-16T11:19:06+5:30
शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी देण्यात येईल, याचा पुनरुच्चार करून येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याचा संकल्पही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलून दाखवला.

कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
सातारा : राज्यात कांद्याचा दर घसरल्याने आजपासून राज्यात १२ रुपये ३५ पैसे प्रतिकिलो या दराने कांदा खरेदी करून शासन शेतकऱ्यांना दिलासा देईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केली. शेतकऱ्यांना ३० जूनपूर्वी कर्जमाफी देण्यात येईल, याचा पुनरुच्चार करून येत्या पाच वर्षांत महाराष्ट्र बेघरमुक्त करण्याचा संकल्पही त्यांनी बोलून दाखवला.
येथील सैनिक स्कूल मैदानावर राज्यात पाच लाख घरकुले पूर्ण झाल्याचा लोकार्पण आणि १० हजार कोटी निधी वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम शुक्रवारी झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. केंद्रीय ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चाैहान, खासदार उदयनराजे भोसले, पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामीण विकासमंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित होते.
सातारा जिल्हा महाराष्ट्राचा ‘सितारा
केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सातारा हा देशाचा स्वाभिमान, तर महाराष्ट्राचा सितारा आहे, असे सांगत भाषणाला सुरुवात केली. ते म्हणाले, देशाच्या इतिहासात एखाद्या राज्याला ३० लाख घरे मिळाली हे प्रथमच महाराष्ट्रात घडले आहे.
साखर कारखानदारांची दिल्लीत बैठक घेणार
‘एका वर्षात पाच लाख घरे बांधून महाराष्ट्राने देशात रेकॉर्ड केला आहे. आता ३० लाख घरे बांधण्यात येतील. झोपडपट्टीतील सव्वाकोटी जनता पक्क्या घरात राहण्यास येईल. या नवीन घरात सोलार यंत्रणा असेल. यामुळे त्यांना विजेचे बिल येणार नाही. राज्यात ऊस कारखानदारांचा विषय आहे. यासाठी दिल्लीत बैठक घेऊन कारखानदारांवरील संकट दूर करू.’