Rajasthan Political Crisis: पाच का पंच! राजस्थानात कशी आणि कोणी वाचवली गेहलोतांची खुर्ची; वाचा इनसाईड स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 05:55 PM2020-07-13T17:55:22+5:302020-07-13T18:03:13+5:30

राजस्थानमधील सत्ता संघर्षात काँग्रेसला सध्या तरी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. काँग्रेसकडे १०९ आमदारांचा पाठिंबा असल्यानं सरकार स्थिर असल्याचा दावा पक्षाकडून करण्यात येत आहे. त्यातच आता वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानं उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा सूरदेखील नरमला आहे. त्यामुळे सरकारवरील संकट दूर झाल्याचं बोललं जात आहे. राजस्थानातल्या सत्ता संघर्षात काँग्रेसच्या पाच नेत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आणि मध्य प्रदेशची पुनरावृत्ती टळली.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे सुरजेवाला यांना काल संध्याकाळी जयपूर गाठलं. प्रत्येक क्षण महत्त्वाचा असल्यानं ते चार्टर्ड प्लेननं जयपूरला आले. जयपूरमध्ये दाखल होताच त्यांनी आमदारांशी संवाद साधण्याचा धडाका लावला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी आमदारांची बैठक बोलावली. व्हिप जारी केला. बैठकीला अनुपस्थित राहिल्यास पक्षाचं प्राथमिक सदस्यत्वदेखील जाईल, असा थेट इशारा त्यांनी दिला.

सकाळच्या सुमारास त्यांनी सूर बदलला. सचिन पायलट यांच्यासोबत चर्चेचा वाव राहावा यासाठी त्यांनी भूमिकेत थोडा बदल केला. पायलट यांच्यासह सर्व आमदारांसाठी पक्षाचे दरवाजे खुले होते, आहेत आणि राहतील, असं सुरजेवाला म्हणाले. दिल्लीतून आलेल्या नेत्यांसोबत त्यांनी आमदारांचा संवाद साधून दिला.

राजस्थान काँग्रेसचे प्रभारी अविनाश पांडे यांनीदेखील महत्त्वाची भूमिका पार पाडली. संकटाची तीव्रता लक्षात घेऊन ते जयपूरमध्ये ठाण मांडून बसले.

आमदारांना एकत्र ठेवण्याची कामगिरी पांडे यांनी पार पाडली. त्यामुळे पक्षाला मोठा दिलासा मिळाला.

काँग्रेस नेतृत्त्वानं सुरजेवाला यांच्यासोबतच दिल्लीचे माजी प्रदेशाध्यक्ष अजय माकन यांनादेखील जयपूरला पाठवलं होतं. माकन यांचा सुरजेवाला यांच्यासोबत मुख्यमंत्री गेहलोत, राज्यातील मंत्री आणि आमदारांशी संवाद सुरू होता.

सचिन पायलट यांच्यासोबत जाऊ शकतील, असा संशय असणाऱ्या आमदारांशी माकन यांनी संवाद साधला.

काल रात्री सुरजेवाला आणि माकन यांना जयपूरला पाठवण्यात आलं. त्यानंतर नेतृत्त्वानं सकाळी महासचिव के. सी. वेणुगोपाल जयपूरमध्ये दाखल झाले.

सरकार पूर्णपणे स्थिर असल्याचा विश्वास पक्षाच्या आमदारांचा देण्याची जबाबदारी वेणुगोपाल यांनी पार पाडली.

वेणुगोपाल यांनी पार पाडली. राजस्थानात काँग्रेसला मध्य प्रदेशची पुनरावृत्ती टाळायची होती. त्यामुळेच पडद्यामागून जोरदार हालचाली सुरू होत्या. महासचिव प्रियंका गांधी यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली.

प्रियंका गांधींनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यासोबत संवाद साधला. त्या दोन्ही नेत्यांच्या संपर्कात होत्या. त्यामुळे आता पायलट यांच्याकडून बंड थंड होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.