OMG! तुमच्या लक्षात आलेय का? बाजारातून हळूहळू या गोष्टी गायब होऊ लागल्यात, घरातूनही होतील...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 03:05 PM2022-07-25T15:05:17+5:302022-07-25T15:10:05+5:30

plastic ban news: तुम्ही नोटिस केलेय का? तुम्ही जेव्हा बाजारात जाता काही वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला दुकानदार त्या वस्तू तशाच देतो, ज्या पहिल्या तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीत दिल्या जात होत्या.

सध्या बाजारातून काही गोष्टी गायब होऊ लागल्या आहेत. तुम्ही नोटिस केलेय का? तुम्ही जेव्हा बाजारात जाता काही वस्तू खरेदी करता तेव्हा तुम्हाला दुकानदार त्या वस्तू तशाच देतो, ज्या पहिल्या तुम्हाला प्लॅस्टिकच्या पिशवीत दिल्या जात होत्या. त्या आता बाजारातून गायब होऊ लागल्या आहेत.

याशिवाय सिंगल यूज प्लास्टिक ज्या वस्तूंसाठी वापरण्यात येत होते, त्या वस्तूही आता बाजारातून गायब होऊ लागल्या आहेत. बर्थडे केक कापण्यासाठी जी कचकड्यासारखी प्लॅस्टिकची सुरी दिली जायची ती आता बंद झाली आहे. आता लाकडी चाकू मिळू लागला आहे. सरकारने १ जुलैपासून सिंगल यूज प्लॅस्टिक बंद केले आहे.

तुम्ही या काळात जर डी मार्टला गेला असाल तर तुमच्या लक्षात आले असेल १,२, ३, ५ किलोच्या ज्या पिशव्या मिळत होत्या त्या देखील बंद झाल्या आहेत. आता तिथे पांढऱ्या कागदाच्या पिशव्या दिसत आहेत. त्यांना गोंदाने चिकटविले जात आहे. त्यातून गॅप राहिली किंवा वजन पेलले नाही तर त्या फाटत आहेत. यामुळे धान्य वाया जात आहे.

पॉलिथीन बॅगेसह अनेक वस्तू आता बाजारातून गायब होऊ लागल्या आहेत. ज्या लोकांकडे आहेत, ते चोरून याचा वापर करत आहेत. सरकारने १ जुलैपासून दीड डझनांहून अधिक प्लास्टिकच्या वस्तू बॅन केल्या आहेत. प्लास्टिक कचऱ्यामुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी भारत सरकारने ठोस पावले उचलली आहेत.

याच सोबत ईअर बड्स, फुग्यांसाठी वापरले जाणारी प्लॅस्टिक स्टिक, प्लॅस्टिकचे झेंडे, कँडी स्टिक, आयस्क्रीम स्टीक, थर्माकोल प्लेट, कप, ग्लास, चमचे आदी प्लॅस्टिक वस्तूंच्या वापरावर बंदी आणण्यात आली आहे.

प्लास्टिक ग्लास, कप देखील आता बाजारातून कमी होताना दिसू लागले आहेत. त्याजागी आता पेपर कप आणि ग्लास दिसत आहेत. स्ट्रॉ देखील आता बंद झाले आहेत. आता त्याऐवजी कागदी स्ट्रॉ दिसत आहेत.

येत्या १५ ऑगस्टला देखील तिरंगा आता प्लॅस्टिकचा मिळणार नाही. त्यावरही सरकारने प्रतिबंध लादले आहेत. आता तिरंगा कागदी किंवा कापडी मिळणार आहे. तुमच्या ऑफिसमधूनदेखील आता प्लॅस्टिकचे चमचे गायब होऊ लागतील.

असे असले तरी आता घराघरात आधीच आणलेल्या प्लॅस्टिकच्या वस्तू असतील. ते जेव्हा वापरून फेकायची वेळ येईल तेव्हा घरातील साठादेखील हळूहळू संपेल. आणि एक दिवस तुमचे घरच प्लॅस्टिक मुक्त म्हणजे कमी प्लॅस्टिकचे होईल.

सिंगल यूज प्लॅस्टिक जे आहे ते अनेकदा फेकून देण्यात येते. हे प्लॅस्टिक रिसायकल देखील होत नाही. अधिकांशी प्ल्रस्टिक जाळले जाते किंवा जमीनीच्या खाली गाडले जाते. यामुळे पर्यावरणाला नुकसान होत आहे.