CoronaVirus News : "हर्ड इम्युनिटी' हा कोरोनावरचा यशस्वी उपाय नाही'; नव्या रिसर्चमधून मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 09:14 AM2020-08-04T09:14:44+5:302020-08-04T09:58:04+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हर्ड इम्युनिटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र हर्ड इम्युनिटीबाबत आता रिसर्चमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून योग्य ती काळजी घेतली जात आहे.

जगात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहे. देशातही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांच्या संख्येन तब्बल 18 लाखांचा टप्पा पार केला आहे.

सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. दर दिवशी देशात कोरोनाचे जवळपास 50 हजार रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे चिंता वाढली आहे.

देशामध्ये सोमवारी कोरोनाचे 52,972 नवे रुग्ण आढळल्याने रुग्णांची एकूण संख्या आता 18 लाखांहून अधिक झाली. तसेच देशभरात कोरोनामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

कोरोनाच्या संकटात दिलासादायक बाब ही की, कोरोनामधून पूर्णपणे बरे झालेल्यांचा आकडा 11 लाख 86 हजारांवर गेला आहे. तसेच अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

देशात आता हर्ड इम्युनिटीमुळे मुंबई आणि दिल्लीकरांच्या आशा वाढल्या आहेत. या दोन मोठ्या शहरांमधील अनेक नागरिकांना कोरोना होऊन गेला. त्यातून ते आपोआप बरे झाले.

रुग्णांच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हर्ड इम्युनिटीचा मुद्दा चर्चेत आला आहे. मात्र हर्ड इम्युनिटीबाबत आता रिसर्चमधून महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

'हर्ड इम्युनिटी' हा कोरोनावरचा यशस्वी उपाय नाही असा मोठा खुलासा नव्या रिसर्चमधून करण्यात आला आहे. तसेच यामुळे व्हायरस नष्ट होणार नसल्याचं देखील तज्ज्ञांनी म्हटलं आहे.

प्रत्येक 5 कोरोना रुग्णांपैकी 1 रुग्णांमध्ये योग्य प्रमाणात अँटीबॉडी तयार झाल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे अशात हा कोरोनावरचा उपाय नसल्याचं रिसर्चमध्ये म्हटलं आहे.

इन्स्टीट्यूट ऑफ लिवर अँड बिलीरी सायन्सेजचे संचालक डॉ. एसके सरीन यांनी 'हर्ड इम्युनिटी' बद्दल ही अत्यंत महत्त्वाची माहिती दिली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं आहे.

कोरोनासोबत लढण्यासाठी ‘हर्ड इम्युनिटी’ हा उपाय नाही असं मत सरीन यांनी व्यक्त केल्यामुळे चिंता वाढली आहे. डॉक्टरांच्या टीमने याबाबत रिसर्च केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दिल्ली, मुंबईत झालेल्या सीरो सर्व्हेमधून काही दिवसांपूर्वी अतिशय दिलासादायक आकडेवारी समोर आली. मुंबईतल्या झोपडपट्टी भागात राहणाऱ्या 57 टक्के, तर इमारतींमध्ये राहणाऱ्या 16 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं सर्वेक्षणातून समोर आलं होतं

तीन विभागांमध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी पुढे आली. त्यामुळे हर्ड इम्युनिटीच कोरोना संकटातून देशाला बाहेर काढेल, अशी चर्चा सुरू झाली होती.

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात हर्ड इम्युनिटी कोरोनाचा सामना करण्याची रणनीती असू शकत नाही, असं आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांनीही याआधी स्पष्ट केलं होतं.