Hardik Pandya Mumbai Indians IPL 2026: मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमधील प्रवास रविवारी RCBविरूद्ध पराभवाने संपला. मुंबईने ११ पैकी केवळ ३ विजय मिळवले. त्यामुळे ते आता प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. याचदरम्यान मुंबई इंडियन्स आणि कर्णधार हार्दिक पांड्या यांच्यात सारंकाही आलबेल नाही अशीही चर्चा रंगली आहे. गेल्या दोन सामन्यात हार्दिक संघाबाहेर होता. त्यातच त्याने मुंबई इंडियन्सला आधी अनफॉलो केले, मग पुन्हा फॉलो केले. या गोंधळानंतर अखेर मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी या साऱ्या घटनांवर प्रतिक्रिया दिली.
हार्दिक पांड्याबाबत मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने काय म्हणाले?
"हार्दिक पांड्या सध्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. त्याच्या पाठीचे दुखणे वाढले आहे. तो त्यावर उपचार घेत असून त्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातून तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही. वैद्यकीय अधिकारी त्याच्यावर उपचार करत आहेत. गेल्या काही दिवसात त्याला सराव करता आलेला नाही. त्यामुळे आम्ही त्याला संघात खेळवण्याची जोखीम घेतली नाही. आमची वैद्यकीय टीम त्याच्यावर दररोज देखरेख ठेवत आहोत. त्याच्या सुधारणेकडे रोज लक्ष ठेवले जाईल आणि मगच त्याच्याबद्दलचा निर्णय घेतला जाईल," अशा शब्दांत महेला जयवर्धने यांनी हार्दिक पांड्याबाबत माहिती दिली.
मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीबद्दल...
"आमच्यासाठी यंदाचा हंगाम निराशाजनक गेला. आमच्याकडे अनेक संधी होत्या पण आम्हाला त्याचा चांगला वापर करून घेता आला नाही. आम्ही गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीत कमी पडलो. आमच्या संघाच्या पराभवातून ते स्पष्ट दिसून येते. आम्ही जर आणखी दोन ते तीन सामने जिंकले असते तर आम्हीही प्लेऑफ्सच्या शर्यतीत कायम राहू शकलो असतो. पण आम्हाला ते विजय मिळवता आले नाहीत. RCB विरूद्धही आम्ही जिंकण्याच्या जवळ पोहचलो होतो, पण अखेर पराभूत झालो," असे जयवर्धने म्हणाला.