“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 14:23 IST2026-05-11T14:15:57+5:302026-05-11T14:23:54+5:30
PM Modi Gujarat Somnath Mandir: जगातील कोणतीही शक्ती भारतावर दबाव आणू शकत नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
PM Modi Gujarat Somnath Mandir: काही महिन्यांपूर्वीच इथे होतो, तेव्हा सोमनाथ स्वाभिमान पर्व साजरे करत केले. एक हजार वर्षांनीही सोमनाथ अविनाशी आहे. या आधुनिक स्वरूपाच्या प्रतिष्ठापनेला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आपण केवळ या दोन कार्यक्रमांमध्ये सहभागी झालो नाही; तर भगवान शिवाने आपल्याला हजारो वर्षांच्या अमृतमय प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी दिली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गुजरातमधील ऐतिहासिक सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराला ७५ वर्षे झाल्याबाबत आयोजित विशेष कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी यांनी पोखरण येथे केलेल्या अणुचाचणीची आठवण सांगितली. देशाने पोखरण अणुचाचणीला 'ऑपरेशन शक्ती' असे नाव दिले, कारण शिवासोबत शक्तीची पूजा करणे ही आपली परंपरा आहे. आपली शिव आणि शक्तीची उपासना देशाच्या वैज्ञानिक प्रगतीलाही प्रेरणा देत राहो. आज आपण हा संकल्प साकार होताना पाहत आहोत. भगवान सोमनाथांच्या चरणी लीन होऊन सर्व देशवासियांना 'ऑपरेशन शक्ती'च्या वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
जगातील कोणतीही शक्ती भारतावर दबाव आणू शकत नाही
हा दिवस आणखी एका कारणासाठी खास आहे. ११ मे १९९८ रोजी देशाने पोखरणमध्ये तीन अणुचाचण्या केल्या. आपल्या शास्त्रज्ञांनी जगाला भारताची ताकद आणि क्षमता दाखवून दिली. भारत कोण आहे, अणुचाचण्या करण्याचा दर्जा कोणाला आहे, यावरून जगात एकच खळबळ उडाली होती. जगभरातील शक्ती भारताला नमवण्यासाठी पुढे आल्या. असंख्य निर्बंध लादण्यात आले. आर्थिक संधीचे सर्व मार्ग बंद करण्यात आले. पण १३ मे रोजी आणखी दोन अणुचाचण्या घेण्यात आल्या. यातून भारताची अढळ राजकीय इच्छाशक्ती जगाला दिसून आली. त्यावेळी संपूर्ण जग भारताच्या दबावाखाली होते. पण अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारने दाखवून दिले की राष्ट्र प्रथम येते. जगातील कोणतीही शक्ती भारताला वाकवू किंवा दबाव आणू शकत नाही.
दरम्यान, ७५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार झाला होता. हा काही साधा प्रसंग नव्हता. भारताला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले असले तरी, १९५१ मध्ये झालेल्या सोमनाथच्या प्रतिष्ठापनेने भारताच्या स्वतंत्र वृत्तीची घोषणा केली. सोमनाथचा अमृत महोत्सव हा केवळ इतिहासातील एक घटनेचा उत्सव नाही. तर तो पुढील हजार वर्षांसाठी भारताच्या प्रेरणेचाही उत्सव आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले.