Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंना दे धक्का! ‘ते’ निर्णय मोदी सरकारच्या रडारवर; नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 10:33 AM2022-07-25T10:33:21+5:302022-07-25T10:37:40+5:30

Maharashtra Political Crisis: पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरेंच्या कामकाजाचे बऱ्याचदा कौतुक झाले होते. पण, आता मोदी सरकार काही निर्णयांची समीक्षा करणार असल्याचे सांगितले जात आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ऐतिहासिक बंडखोरीनंतर पक्षाला मोठेच खिंडार पडल्याचे पाहायला मिळत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आता कंबर कसली असून, आदित्य ठाकरेही (Aaditya Thackeray) सक्रीय झाले आहेत.

शिवसेना आणि शिंदे गटातील संघर्षही दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहेत. यातच आता शिंदे-फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार आल्यावर महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारचे अनेक निर्णय स्थगित केले आहेत. यामध्ये आरे कारशेडसह कोट्यवधींचा निधी रोखण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

यानंतर आता महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील माजी पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचे काही निर्णय केंद्रातील मोदी सरकारच्या रडावर आल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे तर या निर्णयांचे ऑडिट केले जाणार असल्याचेही म्हटले जात आहे.

पर्यावरणमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कामकाजाचे बऱ्याचदा कौतुक झाले होते. आदित्य ठाकरे यांनी पर्यावरणमंत्री म्हणून गेल्या अडीच वर्षांच्या काळात घेतलेल्या निर्णयांचे आणि कामकाजाचे मोदी सरकारकडून ऑडिट होणार आहे. केंद्र सरकारकडून विशेषतः महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कारभाराचे ऑडिट केले जाणार आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मंडळाच्या कारभाराबाबत काही नव्या सूचना, उपाययोजना होणार असतील तर चांगलेच, पण उगाच मंडळ बदनामीचे धनी होऊ नये, अशी अपेक्षा कर्मचारी आणि अधिकारींनी व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्र प्रदूषण मंडळातील कारभाराचे ऑडिट सुरुही केले असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात मुख्यालयाबरोबर नागपूर कार्यालयाचा समावेश आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्यात इतर विभागीय कार्यालयांचेही ऑडिट करण्याबाबत खातेप्रमुखांना सूचना देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, ठाणे, रायगड आदी विभागांतील कार्यालयात हे केंद्रीय ऑडिट सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

दुसरीकडे, पक्षातील ऐतिहासिक बंडाळीनंतर आता आदित्य ठाकरे चांगलेच सक्रीय झाले आहेत. मुंबईतील निष्ठा यात्रेनंतर आता शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. राज्यभर दौरे सुरू असून, युवासैनिक आणि शिवसैनिकांना साद घालण्यास सुरुवात केली आहे.

यावेळी घेण्यात आलेल्या सभांमध्ये आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे गटातील बंडखोरांवर सडकून टीका करत आहेत. आदित्य ठाकरे यांची बंडखोरांचा उल्लेख वारंवार 'गद्दार-गद्दार', असाच केला होता. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळत असून, लवकरच महाराष्ट्र शिवसेनामय होईल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला होता.