15 ऑगस्टला पंतप्रधान मोदींनी लडाखवरून सुनावलं; आता अशी आली चीनची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2020 09:44 PM2020-08-17T21:44:02+5:302020-08-17T21:55:27+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्टला लाल किल्यावरून दिलेल्या भाषणावर आता चीनने प्रतिक्रिया दिली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी सैन्य शक्ती वाढवण्याबरोबरच देशाचे सार्वभौमत्व सर्वोपरी आहे, असे म्हटले होते. यावर सोमवारी चीन म्हणाला, भारतासोबत मतभेद सोडविण्यासाठी आणि परस्पर विश्वास वाढविण्याच्या दृष्टीने पुढे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत.

पंतप्रधान मोदींनी चीनचे नाव न घेता लडाखमधील सैन्य चकमकीचा उल्लेख केला होता. मोदी म्हणाले होते, आपत्तीच्या काळातही सीमेवर देशाच्या सामर्थ्याला आव्हान देण्याचा घाणेरडा प्रयत्न झाला. मात्र, LoC ते LAC पर्यंत देशाच्या सार्वभौमत्वाकडे ज्याने डोळे वर करून पाहिले, देशाच्या सैन्याने आपल्या वीर जवानांनी त्याला चोख उत्तर दिले आहे. भारताच्या सार्वभौमत्वाच्या सक्षणासाठी संपूर्ण देश एकसाथ उभा आहे. या संकल्पासह आपले वीर जवान काय करू शकतात आणि देश काय करू शकतो, हे जगाने पाहिले आहे.

मोदी यांच्या भाषणासंदर्भात बोलताना चीनच्या परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिजियान म्हणाले, आम्ही पंतप्रधान मोदी यांचे भाषण ऐकले आहे. आम्ही शेजारी आहोत आणि एक अब्जपेक्षाही अधिक लोकसंख्या असलेले, प्रगतीच्या मार्गावर वेगाने पुढे जात असलेले देश आहोत.

झाओ सोमवारी नियमित पत्रकार परिषदेत म्हणाले, भारत आणि चीनचे संबंध चागले झाल्यास केवळ दोन देशांतील लोकांचे हीतच साधले जाणार नाही, तर संपूर्ण क्षेत्रात आणि जगात शांतता, स्थिरता आणि समृद्धिही येईल.

झाओ म्हणाले, एकमेकांचा सन्मान करणे आणि एकमेकांना सहकार्य करणे हा दोघांसाठीही योग्य मार्ग आहे. येणाऱ्या काळात आपल्या हिताच्या दृष्टाने, भारतासोबत आपले मतभेद सोडवण्यासाठी तसेच राजकीय विश्वास वाढवणे आणि दीर्घ काळासाठी द्विपक्षीय संबंध मजबुत करण्यासाठी चीन तयार आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची चिनी माध्यमांतही चर्चा सुरू आहे. चीनच्या सरकारी माध्यमाने म्हटले आहे, की मोदींच्या भाषणाचे विश्लेषण करूनच, पुढे कुठले पाऊल टाकावे, यावर चीनने विचार करायला हवा.

चीनचे सरकारी मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या संपादकीयमध्ये शंघाय इंस्टिट्यूट फॉर इंटरनॅशनल स्टडीजचे संशोधक झाओ गेंचेंग यांनी लिहिले आहे, की चीन आणि भारत यांच्यात 8 ऑगस्टला झालेल्या सैन्य स्थरावरील चर्चेनंतर भारताने आपल्या भूमिकेत काहीही बदल केलेला नाही. याच बरोबर, चीनदेखील आपल्या भूमिकेवर कायम आहे. दोन्ही देशांत अनेक मुद्द्यांवरून अजूनही तणाव आहे. अशातच मोदी पुढे काय पाऊल उचलतात यावरूनच त्यांचा खरा इरादा स्पष्ट होईल.

झाओ पंतप्रधान मोदींच्या भाषणावर म्हणाले, या भाषणाकडे दोन प्रकारे पाहिले जाऊ शकते. एक म्हणजे मोदी अधिक आक्रमक झाले आहेत आणि आर-पारच्या मूडमध्ये आहेत. दुसरे म्हणजे, भारत सरकारला असे वाटते, की चीनविरोधात आतापर्यंत उचलण्यात आलेली पावले पुरेशी आहेत. यामुळेच मोदी स्वातंत्रदिनी जे बोलले ते एवढे महत्वाचे नाही. मात्र, ते पुढे काय भूमिका घेतात, हे अधिक महत्वाचे आहे.

Read in English