Fact Check: ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेसेवा बंद? जाणून घ्या यामागील नेमकं सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 07:05 PM2021-03-15T19:05:49+5:302021-03-15T19:12:57+5:30

Fact Check: ३१ मार्चपर्यंत सर्व भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) सर्व सेवा बंद झाल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. जाणून घ्या या वृत्तामागील नेमकं सत्य... viral news truth about trains cancelled till 31st march

कोरोना संकटामुळे सन २०१९ मधील मार्च महिन्यात भारतीय रेल्वेची (Indian Railway) सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासात ही सर्वांत मोठी घटना होती. देशात अगदी आणीबाणी लागली, तरीही रेल्वेने आपली सेवा कायम चोख बजावली.

३१ मार्चपर्यंत रेल्वे सेवा बंद होणार असल्याचं एक वृत्त सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. (Viral News) यामध्ये भारतीय रेल्वेकडून माहिती देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. कोरोना संकटातून देश हळूहळू सावरत असताना रेल्वे सेवा बंद होणार असल्याविषयी चर्चांना सुरुवात झाली.

अनेक देशवासीयांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, आत्ताच कुठे ठप्प झालेल्या गोष्टींची सुरुवात होताना दिसत आहे. रेल्वे सेवाही हळूहळू सुरू होत आहेत. मग लगेचच भारतीय रेल्वेकडून असा निर्णय कसा घेण्यात आला, असा विचार सामान्य जनता करताना दिसत आहे.

दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात कोरोनाचे रुग्ण वाढत (CoronaVirus cases in India) असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळेही सामान्य नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण तयार होत असल्याचे दिसत आहे. अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे.

यातच ३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेसेवा बंद होण्याच्या वृत्तामुळे सामान्य नागरिकांमध्ये तणाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. परंतु, पीआयबी यांनी या वृत्तामागील फॅक्टचेक करून सत्य समोर आणले आहे. पीआयबीने दिलेल्या माहितीनुसार, हे वृत्त खूप जुने आहे. यासंदर्भात कोणताही निर्णय भारतीय रेल्वेकडून घेण्यात आलेला नाही.

३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेसेवा बंद असल्याची सोशल मीडियावर व्हायरल झालेली माहिती जुनी आहे. या माहितीकडे ३१ मार्च २०२१ च्या दृष्टिकोनातून पाहिले जात आहे. काही मीडियाकडून जुने वृत्त व्हायरल करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

३१ मार्चपर्यंत सर्व रेल्वेसेवा बंद होणार असल्याचे व्हायरल होताच अनेक युझर्सकडून सोशल मीडियावर मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले आहे. काही जणांनी थेट मीडियाला यासाठी जबाबदार धरले आहे. या काळात आणि अशा परिस्थितीत अशी माहिती व्हायरल करण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

काही युझर्सच्या मते हिस्सार, लुधियाना या भागातील काही रेल्वेसेवा बंद करण्यात आल्या आहेत. ही माहिती खरी असल्याचे युझर्सचे म्हणणे आहे.

दरम्यान, भारतीय रेल्वेकडून यासंदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सांगितले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या माहितीवर लोकांनी अधिक विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले जात आहे.

संपूर्ण देशात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. महाराष्ट्रातील काही भागात लॉकडाऊन करण्याबाबत शासन पातळीवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पुन्हा लॉकडाऊन नको असेल, तर कोरोना निर्बंध पाळा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.