“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2026 13:53 IST2026-04-26T13:52:03+5:302026-04-26T13:53:33+5:30
Sanjay Raut News: एक मुलगा भारतीय सैन्यात पाठवा असे ते का म्हणाले नाहीत?, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.

“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
Sanjay Raut News: छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्ता सोडण्याचे ठरविले होते. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले व ते रामदास स्वामींकडे गेले. आता मला जास्त लढायचे नाही व हे मुकुट व सत्ता तुम्ही सांभाळा, असे ते त्यांना म्हणाले. रामदास स्वामी त्यांना म्हणाले की, ठीक आहे. मात्र शिष्याचे कर्तव्य हे गुरुच्या आदेशांचे पालन करणे हे आहे. त्यामुळे आता माझी ही सत्ता तुम्ही सांभाळावी, असे त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना म्हटले होते, असा दावा शास्त्री यांनी केला. यावरून राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी यावर भाष्य केले आहे.
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सरसंघचालक या दोन प्रमुख व्यक्ती आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे भान असायला हवे. त्यांच्या उपस्थितीत अशा बुवा-महाराजांना आणून इतिहासाची मोडतोड करण्याचे कारण काय? छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या ऊर्जेचा, उत्साहाचा आणि शौर्याचा अखंड प्रवाह आहेत. ते कधी थकले नाहीत आणि कधी झुकले नाहीत. म्हणूनच आमचा महाराष्ट्र कधी थकत नाही आणि दिल्लीपुढे कधी झुकत नाही, असे संजय राऊत यांनी नमूद केले.
त्यांचे वय काय? अभ्यास काय? स्वतःपासून ही सुरुवात करायला हवी
त्यांचे वय काय? अभ्यास काय? ते म्हणतात की चार मुले जन्माला घाला. तुम्ही स्वतः ब्रह्मचारी आहात, तुमचे अजून लग्नही झालेले नाही. स्वतः काही करायचे नाही आणि दुसऱ्यांना सांगायचे की चार मुले जन्माला घाला आणि एक मूल आरएसएसला द्या. हे जे कोणी संत महाराज आहेत, त्यांनी स्वतःपासून ही सुरुवात करायला हवी. एका बाजूला सरकार लोकसंख्या नियंत्रणासाठी मंत्रालय स्थापन करते, कोट्यवधी रुपये खर्च करते आणि दुसऱ्या बाजूला अशा माध्यमातून लोकसंख्या वाढवण्याचे सल्ले दिले जातात. एक मुलगा भारतीय सैन्यात पाठवा असे ते का म्हणाले नाहीत?, अशी विचारणा संजय राऊत यांनी केली.
दरम्यान, महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करणे हे जर दुसऱ्या कोणी केले असते तर शिवरायांचा अपमान झाला हो, असे म्हणत रस्त्यावर उतरले असते. यांच्या महाराष्ट्राविषयीच्या संवेदना मेलेल्या आहेत. त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अजिबात प्रेम नाही. हे जे बाबा वगैरे आणले जातात, त्यांचा जो काही नवीन हिंदुत्ववाद सुरू झाला आहे, ज्याद्वारे नवीन इतिहास लिहिला किंवा बदलला जात आहे, हे महाराष्ट्राला मान्य नाही, असे राऊतांनी सांगितले.