बाबो! हायवेला जागा गेली; 400 कोटींची भरपाई पाहून एकाच नावाचे १३ दावेदार प्रकटले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 08:13 PM2020-05-14T20:13:40+5:302020-05-14T22:58:47+5:30

आता खरा चरणजीत कोण याचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे पोलिस डोके आपटून घेत आहेत. या सर्वांच्या चौकशीनंतरच खरा चरणजीत कोण हे स्पष्ट होणार आहे. खरा ट्विस्ट तर शेवटी आहे.

'एक अनार सौ बीमार' ही म्हण ऐकली असेल, असाच प्रकार गुरुग्राममध्ये घडला आहे. आठ एकर जमिनीच्या अधिग्रहनामुळे मालकाला ४०० कोटींची भरपाई जाहीर करण्यात आली आहे.

धक्कादायक म्हणजे ही रक्कम पाहून मालकासारखेच नाव असलेले तब्बल १३ जण उगवले आहेत. यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.

झाले असे की, ८ एकर जमिनीचे हरियाणामध्ये अधिग्रहन केले आहे. दिल्ली-जयपूर हायवेला लागून ही जमीन आहे. २०१३ मध्ये एनएचआय आणि उत्तर प्रदेश ही जमीन अधिग्रहित केली.

प्रकल्पामध्ये जमीन गेल्याने २०१३ मध्ये या जमिनीला सरकारने ४४ कोटी रुपये भरपाई जाहीर केली होती. आज या रक्कमेवरील व्याज वाढून ती ४०० कोटी रुपये झाली आहे.

ही जमीन चरणजीत सिंह नावाच्या व्यक्तीच्या नावावर होती. यामुळे प्रशासनाने नोटीस काढून जाहिरातही प्रसिद्ध केली होती. यामुळे ही जाहिरात पाहून सुरुवातीला या जमिनीवर दावा सांगणारे सात चरणजीत सिंग जमा झाले.

एवढेच नाही तर सर्वांनीच त्यांच्या वडिलांच्या आणि आईच्या नावाचे पुरावे दिले आहेत. काहींनी तर वंशावळच सादर केली आहे.

एका पाठोपाठ एक सात चरणजीत सिंग उभे ठाकल्याने खरा चरणजीत न्यायालयात गेला. या काळात आणखी ६ चरणजीत सिंग वाढले. त्यांनीही या रकमेवर दावा केला आहे.

या भानगडीची माहिती एका समाजसेवकाला लागली तेव्हा त्याने याची तक्रार मुख्यमंत्री कक्षाकडे केली. यानंतर गुरुग्राम पोलिसांनी सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे.

खरा ट्विस्ट तर पुढे आहे. आरटीआय कार्यकर्ता रमेश कुमार यांनी सांगितले की, ही जमीन चरणजीत सिंग याने १९८० मध्ये खरेदी केली होती. मात्र, त्याचा दिल्लीतील शीख दंगलीत मृत्यू झाला. यानंतर त्याचे पूर्ण कुटुंब परदेशात स्थायिक झाले आहे.

आता खरा चरणजीत कोण याचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश आणि हरियाणाचे पोलिस डोके आपटून घेत आहेत. या सर्वांच्या चौकशीनंतरच खरा चरणजीत कोण हे स्पष्ट होणार आहे.

Read in English