TATA चा मेगा प्लान! Air India नंतर आता ‘या’ कंपनीतील हिस्सा खरेदी करणार; जाणून घ्या, डिटेल्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 11:48 AM2021-11-20T11:48:04+5:302021-11-20T12:18:05+5:30

TATA ग्रुपकडे Air India ची कमान सोपवण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.

TATA ग्रुपने कोट्यवधींच्या कर्जात बुडालेल्या सरकारी कंपनी Air India ची बोली यशस्वीरित्या पूर्ण करून घरवापसी केली. आता एअर इंडियाची कमान टाटा समूहाकडे सोपवण्याची प्रक्रिया डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल, असे सांगितले जात आहे.

TATA ग्रुपची Tata Sons कंपनी Air India चे पूर्ण संचालन करणार आहे. मात्र, Air India चे संचालन सोपे नसेल, असे सांगितले जात आहे. यासाठी आता टाटा ग्रुपने एक मेगा योजना आखली आहे. ही योजना यशस्वी झाल्यास Air India चे संचालन टाटा समूहासाठी तुलनेने सुलभ होऊ शकते, असे सांगितले जात आहे.

आताच्या घडीला TATA ग्रुपकडे एअर एशिया इंडिया आणि विस्तारा या कंपन्यांचा हिस्सा आहे. एअर एशिया इंडियामध्ये टाटा समूहाचा तब्बल ८४ टक्के हिस्सा आहे. याच एअर एशियामधील हिस्सा वाढवण्याची योजना टाटा करत आहे.

टाटा आताच्या घडीला Air Asia India मध्ये Air India एक्स्प्रेसचे विलिनीकरण करून एकच कंपनी स्थापन करण्याच्या विचारात आहे. एअर एशिया इंडियाचे ८४ टक्के हिस्सा असल्यामुळे एअर इंडियाचे विलिनीकरण करून एकच कंपनी स्थापन करण्याचा अधिकार टाटाला प्राप्त आहे.

तसेच टाटाने विस्तारा आणि एअर इंडियाच्या योग्य आणि नियोजनबद्ध वेळापत्रकासाठी सिंगापूर एअरलाइन्ससोबत चर्चा सुरू केल्याचे सांगितले जात आहे. टाटाची विस्तारामध्ये ५१ टक्के हिस्सेदारी असून उर्वरित हिस्सा सिंगापूर एअरलाइन्सकडे आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, टाटाला एअर एशिया इंडिया आणि एअर इंडियाचे विलिनीकरण करणे अवघड जाणार नाही. यामुळे टाटा सन्सला एकाच कंपनीचे संचालन करावे लागेल. यानंतर पायाभूत सुविधांचा विकास, विस्तार करणे सुलभ होऊ शकणार आहे.

दरम्यान, आताच्या घडीला Air India वर ६१ हजार ५६२ कोटी रुपयांचे कर्ज आहे. यापैकी ७५ टक्के कर्ज टाटा समूहाकडे हस्तांतरण करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या तिजोरीतून चुकते करण्यात येणार आहे. उर्वरित कर्ज TATA समूह फेडणार आहे.

TATA समूहातील टाटा सन्सकडे एअर इंडियाचा कार्यभार एप्रिल २०२२ पर्यंत मिळेल, असे सांगितले जात आहे. एअर इंडियाची एकूण १४१ विमाने टाटाला मिळणार आहेत. मात्र, त्यापैकी केवळ ११८ विमाने उत्तमरित्या कार्यरत असल्याचे बोलले जात आहे.

TATA सन्सला २३ विमानांची दुरुस्ती करावी लागणार आहे. Air India च्या विमानांची दुरुस्ती आणि देखभाल यासाठी ३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा सगळा खर्च टाटा सन्सला करावा लागणार आहे. कारण सरकार आता याचा खर्च करणार नसल्याचे सांगितले जात आहे.

TATA ग्रुप प्रचंड मोठा असून, टाटा सन्सला यात कोणतीही अडचण येणार नाही, असे सांगितले जात आहे. मात्र, तराही टाटा समूह Air India अधिग्रहणासाठी तब्बल १८ हजार कोटींचे कर्ज घेणार असल्याची माहिती मिळाली आहे.

Air India कडे आताच्या घडीला ५८ एअरबस, A320 फॅमिली विमाने, १४ बोइंग 777, २२ B787 ड्रीमलाइनर आणि AI एक्सप्रेसची २४ B737 एअरवर्थ असा विमानांचा भरगच्च ताफा आहे. हा सर्व ताफा TATA सन्सला मिळणार आहे.

TATA सन्स Air India च्या अधिग्रहणापूर्वी थोड्या कालावधीसाठी सल्लागारांची तुकडी तयार करत आहे. यात टाटा सन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, ज्यात बोर्ड सदस्य, जागतिक उड्डाण तज्ज्ञ आणि एअर इंडियाचे काही उच्च अधिकारी असतील. एअर इंडियाचा समावेश असलेल्या गटासाठी निधी योजनांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.