म्हातारपणी दरमहा पेन्शन हवंय? मोदी सरकारच्या 'या' योजना जाणून घ्या...

By मोरेश्वर येरम | Published: December 25, 2020 03:45 PM2020-12-25T15:45:13+5:302020-12-25T15:52:33+5:30

तुम्हाला वृद्धापळात दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मिळकतीची चिंता वाटत असेल तर तुमच्यासाठी अनेक योजना आहेत.

तुम्हाला वृद्धापळात दैनंदिन जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या मिळकतीची चिंता वाटत असेल तर तुमच्यासाठी अनेक योजना आहेत. मोदी सरकारच्या या योजनांमध्ये आतापर्यंत लाखो लोकांनी खातं उघडलं आहे. कोणत्याही एका योजनेत सहभागी झालात तर वयाच्या ६० वर्षानंतर प्रत्येक महिन्याला पेन्शन मिळेल.

अटल पेन्शन योजना ही मोदी सरकारची लोकप्रिय योजना आहे. तुम्ही जर सरकारी नोकरीत नसाल तर या योजनेचा लाभ घेऊ शकता. केंद्र सरकारच्या या योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना निवृत्तीनंतर किमान १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंतची मासिक पेन्शन मिळू शकते. पोस्ट ऑफीस किंवा कोणत्याही बँकेत तुम्ही अटल पेन्शनचं खातं उघडू शकता.

अटल पेन्शन योजनेत १८ ते ४० वयापर्यंतचेच नागरिक गुंतवणूक करु शकतात. १८ वर्षांचा युवक या योजनेत सहभागी झाला तर वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ५ हजार रुपये मिळकतीसाठी त्याला आता दरमहा फक्त २१० रुपये भरावे लागणार आहेत.

केंद्र सरकारने शेतकऱ्यांना पेन्शन उपलब्ध करुन देण्यासाठी किसान मानधन योजना सुरू केली आहे. याअंतर्गत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्याला वयाच्या ६० वर्षानंतर कमीत कमी दरमहा ३ हजार रुपये पेन्शन दिली जाते. या योजनेत १८ वर्षांचा शेतकऱ्यानं खातं उघडलं तर त्याला दरमहा फक्त ५५ रुपये भरायचे आहेत. तर ज्यांची वय ३० वर्षांहून अधिक आहे त्यांना दरमहा ११० रुपये भरावे लागतील. विशेष म्हणजे, या योजनेत फक्त शेतकरीच खातं उघडू शकतात.

असंघटीत क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी केंद्र सरकारने पंतप्रधान श्रम योगी मानधन योजना सुरू केली आहे. असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या सामन्यांना वृद्धापकाळात आर्थिक आधार देण्यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत खातं सुरु करणाऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ३ हजार रुपये पेन्शन मिळते. वयवर्ष १८ ते ४० पर्यंतच्या कोणत्याही भारतीय नागरिकाला या योजनेत सहभागी होता येतं.

लघु उद्योग करणाऱ्यांना वृद्धापकाळात मदत मिळण्यासाठी केंद्राने पंतप्रधान लघु व्यापारी मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेतही वयाच्या ६० वर्षांनंतर खातेधारकाला दरमहा ३ हजार रुपये पेन्शन स्वरुपात मिळतात. १८ वर्षीय उघु व्यापाऱ्यानं या योजनेत खातं उघडलं तर त्याला दरमहा फक्त ५५ रुपये जमा करावे लागतील. तर ३० वर्षांवरील खातेधारकाला ११० रु. जमा करावे लागतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या योजनेची सुरुवात गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात केली होती. मुख्यत्वे लघु उद्योजकांसाठी ही योजना सुरु केली आहे. या योजनेत खातं उघडण्यासाठी संपूर्ण देशात ३.२५ लाख सेवा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. जवळच्या सेवा केंद्राची ऑनलाइन पद्धतीनं माहिती मिळवून तुम्ही नोंदणी करु शकता. महत्वाची बाब म्हणजे आयकर भरणाऱ्या उद्योजकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. यासोबत वयवर्ष ४० पेक्षा अधिक असणाऱ्यांचंही खातं उघडता येत नाही.