भारताची श्रीमंती पाहिलीत का? देशाची दोन बजेटची रक्कम जोडली तरीही पुरून उरेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 01:05 PM2019-10-25T13:05:37+5:302019-10-25T13:08:28+5:30

धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या सणाला देशात सोन्याची मागणी नेहमीच वाढते. जगाच्या मागणीच्या एक चतुर्थांश एवढी प्रचंड मागणी देशभरातून केली जाते. वर्ल्ड गोल्ड काउंसिलनुसार भारतातील घरे आणि मंदिरांमध्ये तब्बल 25000 टन सोने ठेवण्यात आलेले आहे. याची किंमत 70 लाख कोटी एवढी आहे.

जगभरात असलेल्या सोन्याच्या 15 टक्के भाग हा घरे आणि मंदिरांमध्ये आहे. अमेरिकेच्या केंद्रीय बँकेमध्ये केवळ 8133.5 टन सोने आहे. विचार केल्यास भारतीयांकडे या बँकेपेक्षा तिप्पटीने जास्त सोने आहे.

चीन नंतर भारतात जगातील मोठी सोन्याची बाजारपेठ आहे. मात्र, इथे सोन्याचे उत्पादन 0.5 टक्क्यांहूनही कमी आहे. मागणी एकूण जागतिक मागणीच्या 25 टक्के आहे. गेल्या 10 वर्षांतील आकडेवारीनुसार भारतात वर्षाला 800 ते 900 टन सोन्याची मागणी नोंदविली जाते.

पुढील 5 ते 10 वर्षांत भारतात सोन्याची मागणी आणखी वाढली आहे. कारण भारतीयांचे उत्पन्न कमालीचे वाढत चालले आहे. यामुळे गरीबीतून बाहेर पडण्यास मदत होत आहे. यामुळे अनेकजण गरीबी रेषेपेक्षा वर येणार आहेत. हेच लोक सोन्याची मागणी वाढविणार आहेत.

भारतात जेवढे सोने आहे त्याची किंमत देशाच्या दोन बजेटपेक्षा जास्त आहे. 2019-20 चे बजेट 27,86,349 कोटी रुपये आहे. देशातील पहिल्या 100 श्रीमंतांकडे 32.19 लाख कोटी रुपये आहेत. तर देशवासियांकडे 70 लाख कोटींचे सोने आहे.

कोणे एके काळी भारताला सोन्याची खाण म्हटले जात होते. मुघल, इंग्रजांसारखी परकीय आक्रमणे आली. त्यांनी देश ओरबाडून नेला, तरीही एवढे प्रचंड सोने भारतात आहे.

टॅग्स :सोनंGold