"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 16:23 IST2026-05-11T16:13:55+5:302026-05-11T16:23:35+5:30
PM Modi vs Congress: भारतावरील संकट हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नाकर्तेपणा अन् बेफिकीरवृत्तीचा परिणाम असल्याचीही केली टीका

"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
PM Modi vs Congress: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला काही सल्ले दिले. यावरून काँग्रेसने मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पेट्रोल-डिझेल, सोने खरेदी, खतांचा वापर व खाद्यतेलाच्या वापरावर केलेला उपदेश म्हणजे देश चालवण्यास ‘कॉम्प्रमाइज्ड पंतप्रधान’ सपशेल फेल ठरल्याचे द्योतक आहे. जनतेला त्याग करण्याचा नाहक सल्ला व उपदेश दणारे मोदी व त्यांचे सहकारी मात्र कोट्यवधी रुपयांची उधळण करत आहेत. सगळा त्याग जनतेने करायचा आणि नरेंद्र मोदी फक्त कॅमेऱ्यासमोर भाषण देत फिरणार का? प्रचारमंत्री नरेंद्र मोदी यांनीच ‘राष्ट्रहितासाठी ‘त्याग’ करत वानप्रस्थाश्रमाकडे मार्गस्थ व्हावे ही १४० कोटी जनतेची भावना आहे", असा हल्लाबोल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
"जेव्हा जगातील इतर देश संभाव्य संकटासाठी नियोजन आणि तयारी करत होते तेव्हा प्रचारमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष फक्त निवडणुका, जाहिराती, धर्मांधता आणि द्वेषाचे राजकारण करण्यात मग्न होते. नरेंद्र मोदी यांच्या निष्काळजीपणाची, अहंकारी, लहरी कारभाराची मोठी किंमत देशातील नागरिकांना मोजावी लागत आहे. देशात इंधन आणि LPG गॅसचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे, महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे, सोने-चांदी सर्वसामान्य जनतेच्या आवाक्याबाहेर गेले आहे. अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे, आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी फक्त जाहिरातबाजी, फोटोशूट व इव्हेंटबाजीत व्यस्त आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी देशाच्या अर्थव्यवस्थेची राखरांगोळी केली आणि आता जनतेलाच उपदेश देत स्वतः मात्र ४०-५० गाड्यांचा ताफा घेऊन फिरत आहेत. देशाला दूरदृष्टी असलेला नेता नसला की, यापेक्षा वेगळे काही होणार नाही," असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.
"लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मार्च महिन्यात देशासमोरील संभाव्य धोक्याचा इशारा दिला होता पण सत्तेच्या अहंकारात बुडालेल्या नरेंद्र मोदी सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून देशाला संकटाच्या खाईत ढकलले आहे. कोविड काळात लोक ऑक्सिजनअभावी मरत असताना हे महाशय टाळ्या-थाळ्या वाजवण्याचे आवाहन करत होते. नोटबंदी, जीएसटी, कोविड संकटानंतर देशावर सर्वात मोठे संकट आले आहे आणि या संकटास नरेंद्र मोदी सरकारच जबाबदार आहेत," असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले.