आळस, अपयश आणि नैराश्य यातून बाहेर पडायचे असेल तर ब्रह्म मुहूर्तावर उठा; वापरा ५ सोप्या टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 12:06 PM2022-01-07T12:06:45+5:302022-01-07T12:21:24+5:30

सूर्योदयाच्या दोन तास आधीची वेळ म्हणजे साधारण पहाटे ४.३० ते ६.३० ही ब्रह्ममुहूर्ताची वेळ मानली जाते. त्या काळात उठून इतर कोणतीही कामे न करता स्वतःच्या व्यक्तिमत्त्व विकासावर भर दिला, तर त्याचा दसपटीने अधिक प्रभाव पडतो आणि फायदा होतो.

'लवकर निजे लवकर उठे त्यास आयु आरोग्य लाभे' असे धर्म शास्त्रात म्हटले आहे. परंतु ब्रह्म मुहूर्त दूरच आपण सूर्योदयाच्या वेळीदेखील उठत नाही. परिणामी दिवस उशिरा सुरू होतो आणि उशिरा संपतो. लवकर उठल्यामुळे पहाटेच्या शांत वातावरणात स्वतःवर लक्ष देता येते. त्या कालावधीत दिवसभराच्या तुलनेत कमी विचार असतात. त्यामुळे मन शांत होण्यास, एकाग्र होण्यास वेळ लागत नाही. आपल्याला ज्या क्षेत्रात पुढे जायचे आहे, त्याबद्दल जी तयारी करायची आहे, त्याची आखणी या कालावधीत करणे आपल्याला फायदेशीर ठरते. कारण त्या काळात आपला मेंदू सर्वात जास्त कार्यरत असतो. सकाळच्या वेळी केलेले पाठांतर, वाचन दीर्घकाळ लक्षात राहते. स्मरण शक्ती वाढते. सकारात्मकता वाढते.

पूर्वीच्या काळी ऋषी-मुनी ब्राह्ममुहूर्तावर उठून वेदपठण करत. रात्री वातावरणात रज-तम गुणांचे, म्हणजे त्रासदायक वाटण्याचे प्रमाण अधिक असते, तर पहाटे वातावरण सात्त्विक, म्हणजे आनंददायक असते. सकाळचे वातावरणही शुद्ध आणि पवित्र, तसेच शांत आणि थंड असते. या काळात केलेला नामजप भावपूर्ण होतो, तसेच अभ्यासही चांगला होतो. म्हणून साधकाने ब्रह्म मुहूर्तावर साधना करावी असे सांगितले जाते. आजही योग शिबिरांमध्ये ब्रह्म मुहूर्तावर उठवले जाते. तसेच गायक ब्रह्म मुहूर्तावर उठून रियाज करतात. विद्यार्थी पहाटे उठून अभ्यास करतात. रात्री जागरण करून केलेल्या अभ्यासापेक्षा पहाटे उठून केलेला अभ्यास गुणवत्ता वाढवतो.

पशु, पक्षी, निसर्गदेखील ब्रह्म मुहूर्तावर जागृत होतो. मनुष्यानेदेखील ब्रह्म मुहूर्तावर उठून आपली दिनचर्या सुरू केली, तर त्याला दीर्घायुष्य आणि सुदृढ आरोग्य तर प्राप्त होईलच, शिवाय ताणतणाव, नैराश्य, नकारात्मक विचार यापासून कायमची सुटका मिळेल. विश्वास बसत नसेल, तर किमान २१ दिवस ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचा सराव करून पहा! त्यासाठी वापरा पाच सोप्या टिप्स -

दिवसभर आपण फोन, लॅपटॉप, कॉम्प्युटर अशा कोणत्या ना कोणत्या गॅझेटच्या सान्निध्यात असतोच. एवढेच काय तर रात्री झोपताना देखील हातात मोबाईल असतोच. त्यामुळे लवकर झोप लागत नाही. यासाठी रात्री पुस्तक वाचायची सवय लावा. पुस्तक वाचता वाचता लवकर झोप येते आणि सकाळी लवकर जाग येते.

आपल्याला वाईट सवय असते, ती म्हणजे अलार्म बंद करून परत झोपायची. त्यामुळे पुढच्या पाच मिनिटांनी नाही पण पुढच्या दोन तासांनी जाग येते आणि पश्चातापाने दिवसाची सुरुवात होते. म्हणून अलार्म वाजल्यावर झोपेतून उठून उभे राहा आणि मग तो बंद करा. वॉर्म अप करा. दात घासा. गरम पाणी प्या. त्यामुळे तुम्हाला परत झोपावेसे वाटणार नाही.

आपल्या शरीराचे हेड ऑफिस म्हणजे आपला मेंदू. त्यात आपण जे काही समाविष्ट करतो, त्यानुसार ते आपल्याला सूचना देते. आपण जर आपले ध्येय निश्चित केले, तर आपल्याला अलार्म वाजण्याची वाट बघावीच लागणार नाही, तर अलार्म वाजण्याआधीच आपला मेंदू आपल्याला सूचना देईल आणि जाग येईल. यासाठी एक दोन दिवस नाही तर सलग आठ दहा दिवस ते २१ दिवस सराव करायला हवा.

अनेकदा प्रयत्न करूनही आपल्याला ब्रह्म मुहूर्ताची वेळ साधता येत नाही. उशिरा जाग येते आणि त्याचा पश्चात्ताप दिवसभर राहतो. यासाठी वाईट वाटून न घेता प्रयत्न करत राहा. त्यामुळे तुमचा संयम वाढेल आणि एकदा का सराव झाला की हाच संयम तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत करेल, संकट काळात तुम्ही डगमगणार नाही.

आजच्या ऑनलाईन काळात दूर राहूनही आपण एकमेकांच्या संपर्कात राहू शकतो. पाहू शकतो, बोलू शकतो. या तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या या संकल्पामध्ये तुमच्या एखाद्या मित्र, मैत्रिणीला सामील करून घ्या. त्यामुळे तुम्ही एकमेकांना प्रेरणा देत आपले ध्येय साध्य करू शकाल.