Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 03:40 PM2021-05-12T15:40:55+5:302021-05-12T15:43:42+5:30

Corona Vaccine: कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे, अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.

congress nana patole demands modi govt should declare national policy over corona vaccination | Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका

Corona Vaccine: मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की; नाना पटोलेंची टीका

Next
ठळक मुद्देनाना पटोले यांची केंद्र सरकारवर टीकामोदींच्या अहंकारी, मनमानीपणा, नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्कीकाँग्रेस सरकारने पोलिओचे समूळ उच्चाटन करुन दाखवले

मुंबई: केंद्रातील मोदी सरकार कोव्हिड परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहिमही फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस मिळत नाही. लसीकरणात देशभरात सुसुत्रता दिसत नाही म्हणून केंद्र सरकारने कोरोना प्रतिबंधक लसीचे राष्ट्रीय धोरण जाहीर करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. (congress nana patole demands modi govt should declare national policy over corona vaccination)

मुंबईतील अ-९ या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना पटोले पुढे म्हणाले की, लोकशाही शासन व्यवस्थेत न्यायव्यवस्था ही आत्मा समजली जाते. परंतु, मोदी सरकारने हा आत्माच संपवण्याचे काम सुरू केले आहे. सुप्रीम कोर्टात यापूर्वी कोलगेट, टू जी प्रकरण आले होते त्यावेळच्या युपीए सरकारने कोर्टाला अशा प्रकारे हस्तक्षेप करू नका, असे म्हटले नव्हते. सुप्रीम कोर्टाने देशातील कोरोनाची विदारक परिस्थिती पाहूनच टास्क फोर्स स्थापन केला आहे. केंद्रातील मोदी सरकार लोकांच्या जिवाचे रक्षण करण्यात अपयशी ठरले असून, कोर्टाने टास्क फोर्स स्थापन केल्याने त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असे नाना पटोले म्हणाले.

लसीकरणासाठी तरतूद केलेल्या ३५ हजार कोटींचं काय झालं; रोहित पवारांचा रोकडा सवाल

तेव्हा अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेतला होता का?

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने देशातील सर्व नागरिकांना मोफत कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात असल्याची चुकीची माहिती सुप्रीम कोर्टात सादर करून कोर्टाने यात हस्तक्षेप करू नये, कोर्ट या विषयातील तज्ज्ञ नाही, असे म्हणत कोर्टाचा अवमान केला आहे. नोटाबंदी जाहीर करताना नरेंद्र मोदींनी कोणत्या अर्थतज्ज्ञांचा सल्ला घेतला होता का? नरेंद्र मोदी अर्थतज्ज्ञ आहेत का ? तसे नसतानाही नोटंबदी जाहीर करून लोकांना वेठीस धरले, अशी टीका नाना पटोले यांनी केली. 

“सकारात्मक बातम्यांच्या नावाखाली खोटी माहिती व प्रचार, हे लज्जास्पद”: प्रशांत किशोर

नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे आकलन करून मोदी सरकारने नियोजन केले नाही त्यामुळे हजारो लोक ऑक्सिजन, योग्य आरोग्य उपकरणे, पुरेशा लसींअभावी लोक मरत आहेत. शेकडो मृतदेह जेसीबीच्या सहाय्याने क्रूरपणे दफन केली जात आहेत तर शेकडो नदीच्या पाण्यावर तरंगत आहेत. लस नाही, औषध नाही, ऑक्सिजन नाही, पीएम केअरमधून पुरवलेली उपकरणेही दुय्यम दर्जाची आहेत. मोदींचे आपत्ती धोरण आणि आपत्ती व्यवस्थापन किती पोकळ आहे, याची जागतिक प्रसारमाध्यमांनी पोलखोल केली आहे. कोविड महामारीचे संकट मोदी सरकार हाताळू शकत नाही असा संदेश जगभरात गेला असून भारत एक जागतिक शक्ती म्हणून जगासमोर उभा राहिला होता पण मोदींच्या अहंकारी, मनमानीपणा तसेच नाकर्तेपणामुळे जगात भारताची नाचक्की झाली आहे, असा घणाघात नाना पटोले यांनी केला.

“पंतप्रधान मोदी खूप मेहनत घेतायत, कोरोनाच्या संकटसमयी संयमाने काम करतायत”

काँग्रेस सरकारने पोलिओचे समूळ उच्चाटन करुन दाखवले

भारत पहिल्यांदाच राष्ट्रीय महामारीचा मुकाबला करत नाही. यापूर्वी आलेल्या गोवर, देवी तसेच पोलीओचा मुकाबला भारताने समर्थपणे केला आहे. २० कोटी बालकांचे पोलीओ लसीकरण केले त्यावेळी पोर्टल, ऍप, ओटीपी असे काही नव्हते तरीही ठोस धोरण आखून तत्कालीन काँग्रेस सरकारने पोलिओचे समूळ उच्चाटन करुन दाखवले, ती धमक मोदी सरकारमध्ये दिसत नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. 

निवडणूक ड्युटीवर कोरोनामुळे मृत्यू झाल्यास १ कोटींची भरपाई मिळायला हवी: हायकोर्ट

सत्तेचा अहंकार व विरोधी पक्षाची दखल घ्यायची नाही

काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांनी कोरोना संकटाच्या गंभीर परिणामाचा इशारा मोदी सरकारला दिला होता. वेळीच त्यांचा सल्ला ऐकून कार्यवाही केली असती तर देशाला आजच्यासारख्या विदारक परिस्थितीला सामोरे जावे लागले नसते. केवळ सत्तेचा अहंकार व विरोधी पक्षाची दखल घ्यायची नाही या विकृत मानसिकतेतून केंद्रातील मंत्री, भाजपचे नेते हे सोनिया गांधी व राहुल गांधी यांची खिल्ली उडवण्यात तसेच भाजपच्या आयटी सेलकडून ट्रोल करण्यातच वेळ घालवला. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याबद्दलचे वक्तव्य हे सुद्धा त्यांच्या विकृत मानसिकतेतूनच तसेच सत्तेच्या मस्तवालपणातून आले आहे. विरोधकांनी केलेल्या सूचनांवर अंमलबजावणी केली असती, तर आज दिसत असलेले भयनाक दृश्य पहावे लागले नसते. हजारो-लाखो जीव वाचले असते तसेच भारताची जगात एवढी नाचक्की झाली नसती, असेही पटोले म्हणाले.
 

Web Title: congress nana patole demands modi govt should declare national policy over corona vaccination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.