सर्वसामान्यांची भूक मिटवणाऱ्या 'वडापाव'चा शोध कुणी लावला?; बाळासाहेबांनी दिली प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 08:15 PM2020-02-13T20:15:50+5:302020-02-13T20:21:55+5:30

सर्वसामान्य असो वा भल्या मोठ्या गाडीतून उतरणारा श्रीमंत व्यक्ती असो, मुंबईत सर्वांचा आवडता पदार्थ म्हणजे वडापाव, मुंबईमध्ये आलात अन् वडापाव न खाता गेलात तर त्याला काही अर्थ नाही. सातासमुद्रापार पोहचलेल्या वडापावची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का?

पावाच्यामध्ये बटाट्यापासून बनवलेला वडा, त्यासोबत चटणी, हिरवी मिरची, वाह हे ऐकलं तरी तुमच्या नजरेसमोर वडापाव नक्कीच आला असेल. कॉलेजची तरुणाई असेल किंवा कंपनीमध्ये काम करणारा कर्मचारी, बॉलिवूड स्टार्संनेही वडापावची चव एखादा तरी चाखली असेलच.

पण मग हा वडापाव पदार्थ नक्की कधी आला अन् कुणी आणला हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला नक्की असेल. अशोक वैद्य नावाच्या सामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीने वडापावची कल्पना आणली. १९६६ मध्ये दादर रेल्वे स्टेशनच्या बाहेर अशोक वैद्य वडापाव विकत होते.

याच काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, मराठी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे पण त्याचसोबत कोणत्याही उद्योगात मराठी तरुण मागे राहू नये ही भूमिका त्यांनी मांडली. बाळासाहेब ठाकरेंच्या या वक्तव्याने प्रेरित होऊन अशोक वैद्य यांनी सुरुवातीला फक्त वडा बनवून विकण्यास सुरुवात केली होती.

त्यानंतर वैद्य यांच्या डोक्यात विचार आला की, वड्यासोबत काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्यावेळी शेजारील बेकरीतून वैद्य यांनी काही पाव घेतले. ते पाव कापून त्यात वडा टाकून विकण्यास सुरुवात केली. मराठी लोकांना तिखट आवडत असल्याने वडापावसोबत हिरवी मिरची आणि चटणीही देण्यास सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळात वडापावची विक्री २० पैशाला होत असे. आजच्या घडीला मुंबईचा हा वडापाव फक्त भारतात नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. मोठ्या चवीने लोक वडापाववर ताव मारतात.