"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 21:20 IST2026-05-10T21:16:48+5:302026-05-10T21:20:14+5:30
कोरोना काळाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची एक प्रभावी व्यवस्था विकसित केली होती. आजची परिस्थिती बघता, या व्यवस्था पुन्हा सुरू करणे, देश हिताचे ठरेल."

"पेट्रोल-डिझेल वाचवा... 'वर्क फ्रॉम होम' पुन्हा सुरू करा!"; असं का म्हणताहेत पंतप्रधान मोदी? सोनं खरेदी न करण्याचंही आवाहन
पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद संपूर्ण जगावर जाणवत आहेत. याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरही होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंनी देशवासीयांना मोठे आवाहन केले आहे. "पेट्रोल आणि डिझेलचा वापर संयमाने करायला हवा आणि 'वर्क फ्रॉम होम'ला पुन्हा प्राधान्य द्यायला हवे," असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. यावेळी त्यांनी कोरोना काळाचाही उल्लेख केला. ते रविवारी हैदराबादमध्ये एका जाहीर सभेत बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले, "गेल्या दोन महिन्यांपासून आपल्या शेजारी एक मोठे युद्ध सुरू आहे, याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. मात्र भारताला त्याचा अधिकच गंभीर फटका बसला आहे. भारताकडे स्वतःचे मोठे तेलसाठे नाहीत. आपल्याला आपली गरज पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पेट्रोल, डिझेल, गॅस आणि खते, परदेशातून आयात करावी लागतात. या युद्धामुळे जागतिक बाजारपेठेत या वस्तूंच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत."
कोरोना काळाचा उल्लेख करत काय म्हणाले मोदी? -
कोरोना काळाचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले, "कोरोना काळात आपण वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन मीटिंग्स आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची एक प्रभावी व्यवस्था विकसित केली होती. आजची परिस्थिती बघता, या व्यवस्था पुन्हा सुरू करणे, देश हिताचे ठरेल." तसेच, "आपण इंधनाची बचत करून आपण देशाचे मौल्यवान परकीय चलन वाचवू शकतो, हे प्रत्येक नागरिकाचे उत्तरदायित्व आहे."
पश्चिम आशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदीचं देशवासीयांना मोठं आवाहन -
जागतिक युद्धाचा भारतावर होणारा परिणाम आणि विस्कळीत झालेली पुरवठा साखळी यावर पंतप्रधान मोदी यांनी भाष्य केले. ते म्हणाले, सरकारने नागरिकांवर आर्थिक भार पडू नये, म्हणून स्वतः दबाव स्वीकारला आहे, मात्र आता नागरिकांनीही इंधन बचतीचा संकल्प करायला हवा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, जेथे मेट्रो उपलब्ध आहे तेथे तिचा वापर करावा, कार पूलिंगला प्रोत्साहन द्यावे आणि किमान एक वर्ष परदेश दौरे अथवा परदेशातील लग्नसोहळे टाळून देशांतर्गत पर्यटनावर भर द्यावा. तसेच, एक वर्ष सोन्याची खरेदी टाळण्याचे आणि देशाला आत्मनिर्भर बनवण्यापासून रोखणाऱ्या गोष्टींपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी देशवासीयांना केले.