"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 19:59 IST2026-05-10T19:51:32+5:302026-05-10T19:59:55+5:30
...यानंतर, मोदी हसत पुढे म्हटले, "आपल्याला जेथे पोहोचायचे आहे, पोहोचू शकणार नाही, त्यामुळे, माझ्यासोबत येणेच उत्तम!

"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी तेलंगणा दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी हैदराबादमध्ये जवळपास ९४०० कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यानंतर एका कार्यक्रमात संबोधित करताना ते म्हणाले, "आपले रेवंतजी म्हणाले होते की, आपण राजकीय भाष्य करणार नाही. यामुळे मीही करणार नाही. मात्र, अराजकीय गोष्ट अशी आहे की, केंद्राने १० वर्षांत गुजरातला जेवढे दिले, तेवढे मी आपल्यालाही द्यायला तयार आहे. मात्र मी असे केल्यास, आपल्याला आता जे मिळतेय ते अर्धे होईल." यानंतर, मोदी हसत पुढे म्हटले, "आपल्याला जेथे पोहोचायचे आहे, पोहोचू शकणार नाही, त्यामुळे, माझ्यासोबत येणेच उत्तम!
तत्पूर्वी, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तेलंगणा मॉडेलसंदर्भात अपेक्षा व्यक्त केली होती. रेड्डी म्हणाले होते, "ज्याप्रमाणे मनमोहन सिंग पंतप्रधान असताना आपण (नरेंद्र मोदी यांनी) गुजरात मॉडेल विकसित केले, अगदी तीच अपेक्षा आता तेलंगणाच्या जनतेचीही आहे. २०३४ पर्यंत राज्याला १ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे." तसेच, देशाच्या लोकसंख्येत तेलंगणाचा वाटा ३ टक्क्यांहून कमी असला तरी, मोदींच्या ३० ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेच्या स्वप्नात १० टक्के योगदान देण्याचे उद्दिष्ट राज्याने ठेवले असल्याचेही रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी मध्यपूर्वेतील संकटावरही भाष्य केले. यावेळी त्यांनी जनतेला, पेट्रोलियम उत्पादनांचा वापर संयमाने करण्याचे आवाहन केले. तसेच, आयात केलेल्या पेट्रो उत्पादनांचा गरजेनुसारच वापर करायला हवा. याने परकीय चलन तर वाचेलच, शिवाय युद्धाचे दुष्परिणामही कमी होण्यास मदत होईल, असेही ते म्हणाले.
मोदी पुढे म्हणाले, "सौर ऊर्जा आणि इथेनॉल मिश्रणात भारताने मोठी प्रगती केली आहे. आता सरकार स्वस्त पाईप गॅस आणि सीएनजीवर लक्ष केंद्रित करत आहे. एवढेच नाही तर, भारतातील आधुनिक पायाभूत सुविधांमुळे आपण जागतिक ऊर्जा संकटाचा समर्थपणे सामना करत आहोत, असेही मोदी यावेळी म्हणाले.