"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2026 21:56 IST2026-05-10T21:56:27+5:302026-05-10T21:56:52+5:30
"आयपॅक (I-PAC) सारख्या बाहेरच्या संस्थेने संपूर्ण पक्षावर ताबा मिळवला असून ईडीच्या कारवाईत तथ्य आढळल्यास ममता बॅनर्जी यांना जेलही होऊ शकते," असा खळबळजनक दावा दत्ता यांनी केला आहे.

"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमधील (TMC) अंतर्गत कलह चव्हाट्यावर यायला सुरुवात झाली आहे. पक्षविरोधी भाष्य केल्याचा आरोप करत सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलेले पक्ष प्रवक्ते रिजू दत्ता यांनी आता ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. "आयपॅक (I-PAC) सारख्या बाहेरच्या संस्थेने संपूर्ण पक्षावर ताबा मिळवला असून ईडीच्या कारवाईत तथ्य आढळल्यास ममता बॅनर्जी यांना जेलही होऊ शकते," असा खळबळजनक दावा दत्ता यांनी केला आहे.
एएनआयशी बोलताना रिजू दत्ता यांनी बंगाल पराभवाचे संपूर्ण खापर ममता आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यावर फोडले. ते म्हणाले, "प्रतीक जैन यांच्या घरावर ईडीने छापा टाकला, तेव्हा पक्षाचा डेटा सुरक्षित करण्यासाठी खुद्द 'दीदी' त्यांच्या घरी पोहोचल्या होत्या. सध्या त्यांच्या विरोधात ईडीचे एक प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. याचा निकाल विरोधात गेल्यास ममतांना तुरुंगात जावे लागेल." एवढेच नाही तर, मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यानंतर आयपॅकचे संचालक विनेश चंदेल यांना जामीन मिळणे, याचा अर्थ दीदी विरोधात केस झाली आणि त्या गेल्यानंतर तुम्ही तो डेटा देऊन टाकला, असेही ते म्हणाले.
दरम्यान, रिजू दत्ता यांनी आयपीएस अजय पाल शर्मा यांच्यासंदर्भात तयार केलेल्या एका जुन्या व्हिडिओचाही उल्लेख केला. त्यांनी स्पष्ट केले की, हा व्हिडिओ त्यांनी वैयक्तिक टिप्पणी म्हणून केला नव्हता. तर तृणमूल काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते म्हणून पक्ष मुख्यालयातून आणि पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्ससाठी बनवला होता. मात्र, आता भाजपकडून होणारा वैयक्तिक रोष पाहता आणि कायदेशीर सल्लागारांच्या मार्गदर्शनानुसार, त्यांनी आयपीएस अजय पाल शर्मा यांची बिनशर्त माफी मागितली. तसेच, "मी आता एक सामान्य नागरिक असून मला माझ्या कुटुंबासोबत शांततेत राहायचे आहे," असे म्हणत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचीही विनंती केली.