कोण घाबरतंय, लावा सीडी, चंद्रकांत पाटलांचं खडसेंना आव्हान

By महेश गलांडे | Published: December 26, 2020 07:07 PM2020-12-26T19:07:50+5:302020-12-26T19:30:12+5:30

पुण्यात प्रत्येकाला सेटल व्हावेसे वाटते. पण देवेंद्रजी मी कोल्हापूरला परत जाणार, असे वक्तव्य भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी करताच दुसऱ्या दिवशी त्यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी परत जायला तुम्हाला बोलवलं कुणी होतं?, असा सवाल विचारला होता.

यावर चंद्रकांत पाटलांनी, हुरळून जाऊ नका, पक्षाने एका मिशनवर पाठवले आहे, असा टोला हाणला आहे. तसेच, राष्ट्रवादीत शरद पवारांचाच शब्द अंतिम असल्याचं सूचवत अजित पवारांना खोचक टोलाही पाटील यांनी लगावला.

माझ्या वाक्याने कुणी हुरळूनही जाऊ नये आणि घाबरूनही जाऊ नये. मी कुठेच जाणार नाही. मी इथेच राहणार आहे. माझ्या त्या वाक्याचा शब्दश: कुणी अर्थ घेऊ नये, असे पाटील म्हणाले. माझ्या पक्षाने मला एक मिशन दिलं होते.

त्यामुळे मी इथे आलो. मिशन पूर्ण झाले की परत कोल्हापूरला जाणार. हे मिशन काय आहे हे तुम्हाला कशाला सांगू? असेही चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना सांगितले. तसेच, विरोधक बाहेरचे आहेत. त्यांना माझं मिशन दिसत नाही, दिसणार नाही. त्यामुळे चंद्रकांतदादा पुण्यातून गेलेले बरे असे त्यांना वाटते.

अजित पवारांना आमच्या पक्षाचं काय पडलंय? त्यांनी जरा त्याचं बघावं. त्यांनी काय म्हटलं याच्याशी माझा काही संबंध नाही. अजित पवारांनी त्यांच्या पक्षाची काळजी करावी, त्यांनी त्यांच्या स्थानाची काळजी करावी.

मी वारंवार म्हटलंय की, उद्या महाराष्ट्रामध्ये काही मोठी पोझिशन देण्याची वेळ पवारांवर आली, तर ते कोणाला देणार आहेत हे त्यांनी पवारसाहेबांन विचारुन घ्यावं, असा खोचक टोलाही चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांना लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी खडसेंच्या ईडी नोटीसबद्दलच्या प्रश्नावरही मीडियाशी संवाद साधला. ईडी ही स्वायत्त संस्था आहे, ईडीच्या नोटीसचा आणि भाजपाचा कीहाही संबंध नाही. काहीही झालं की भाजपला लक्ष्य केलं जातं.

यांना सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य नसतो, हायकोर्टाचा निर्णय मान्य नसतो, एकीकडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेचा संदर्भ हे सातत्याने देतात. तर, दुसरीकडे स्वायत्त संस्थांचा निर्णयही मान्य नसतो, असे म्हणत पाटील यांनी भाजपा विरोधी पक्षांवर टीका केली.

तसेच, खडसेंना रोखलंय कुणी, कोण घाबरतं, लावा सीडी.. असे म्हणत एकनाथ खडसेंना आव्हानही दिलंय.

माझी बॅग भरलेलीच आहे. आम्हाला पक्ष सांगेल त्या ठिकाणी जावे लागते. मी राज्याचा अध्यक्ष आहे.

मला एखाद्या जिल्ह्याचा किंवा भागाचा विचार करता येत नाही. त्यामुळे मी पुण्यात राहिलो काय? कोल्हापूरला किंवा नागपुरात राहिलो काय? काहीच फरक पडत नाही, असेही ते म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरं दिली