Pooja Chavan Suicide Case: संजय राठोडांवर राजीनाम्याची टांगती तलवार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज?

By प्रविण मरगळे | Published: February 25, 2021 11:32 AM2021-02-25T11:32:45+5:302021-02-25T11:37:36+5:30

Pooja Chavan Suicide Case, Sanjay Rathod, CM Uddhav Thackeray News: पूजा चव्हाण आत्महत्येनंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन त्यांची बाजू मांडली, मात्र त्यावेळी पोहरादेवी गडावर मोठ्या प्रमाणात शक्तीप्रदर्शन करण्यात आलं, त्यावरून उद्धव ठाकरे नाराज असल्याची माहिती आहे.

पूजा चव्हाण आत्महत्या(Pooja Chavan Suicide Case) प्रकरणावरून मंत्री संजय राठोड(Sanjay Rathod) अडचणीत आले होते, या आरोपानंतर १५ दिवस अज्ञातवासात गेलेले राठोड अचानक मंगळवारी पोहरादेवी गडावर अवतरले, याठिकाणी त्यांनी आतापर्यंत होत असलेल्या आरोपावर स्पष्टीकरण दिलं.

संजय राठोड यांनी माझा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही, मला बदनाम करू नका अशी हात जोडून विनंती केली, मात्र हे करत असताना संजय राठोड यांच्यासाठी समर्थनासाठी पोहरादेवी गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती, येथे सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं,

रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(CM Uddhav Thackeray) राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लोकांना खबरदारी घेण्याचं आवाहन केले होते, लोकांनी शिस्त पाळली नाही तर लॉकडाऊन करावं लागेल असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला होता, त्याचसोबत मुख्यमंत्र्यांनी आंदोलनाच्या गर्दीवरून अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला होता.

मुख्यमंत्र्यानी राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना परवानगी मिळणार नाही असं सांगितलं होतं, परंतु मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला २ दिवस उलटत नाही तोवर पोहरादेवी गडावर मंत्री संजय राठोड यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले, याठिकाणी हजारोंच्या संख्येने लोकं उपस्थित होते,

संजय राठोड यांच्या समर्थनार्थ लोकं जमली होती, पोहरादेवी गडावर धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केले होते, लोकांनी मास्क घातले नव्हते, हजारोंच्या संख्येने आलेल्या गर्दीला रोखण्यासाठी पोलिसांनाही अपयश आलं, काही ठिकाणी पोलिसांनी गर्दी पांगवण्यासाठी लाठीचार्ज केला तर कार्यकर्त्यांनीही पोलिसांवर दगडफेक केली,

पोहरादेवी गडावर झालेल्या गर्दीमुळे शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नाचक्की झाली, विरोधकांनी या गर्दीच्या आधारे मुख्यमंत्र्यावर टीकेचे बाण सोडले, शिवसेना मंत्रीच अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची पायमल्ली करत असेल तर सर्वसामान्य जनतेकडून काय अपेक्षा करणार? असा सवाल विरोधी पक्षाने उपस्थित केला,

त्यानंतर बुधवारी झालेल्या राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु दीड तास ताटकळत ठेवल्यानंतर अवघ्या २ मिनिटांसाठी मुख्यमंत्र्यांनी त्यांना भेट दिली, पोहरादेवी गडावर झालेल्या शक्तीप्रदर्शनामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रचंड नाराज असल्याची माहिती आहे, असं टीव्ही ९ ने वृत्त दिलं आहे.

एकीकडे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं पालन शिवसेना मंत्र्यानेच न करत हजारोंची गर्दी जमा केली त्यामुळे विरोधकांनाही सरकारवर निशाणा साधण्याची आयती संधी मिळाली,

पोहरादेवी गडावर झालेल्या गर्दीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त केली आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे, राठोड यांच्या कृत्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.

इतकचं नाहीतर शिवसेना नेते संजय राऊत यांनीही कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत मुख्यमंत्री खूपच कडक आहेत, जवळचा माणूस असला तरी मुख्यमंत्री सोडणार नाहीत अस सांगत संजय राठोडांवर कारवाई होऊ शकते असे संकेत दिले आहेत.